दहावी, बारावी परीक्षांचा निकाल वेळेत कसा लागेल? परीक्षकांवर उत्तरपत्रिका तपासणीबरोबरच अन्य कामांचा बोजा
दहावी, बारावीच्या परीक्षेचे कामकाज करणाऱ्या शिक्षकांवर अन्य कामांचा बोजाही असल्याने या परीक्षांचा निकाल वेळेत लागेल का…. असा सवाल उपस्थित होत आहे. बोर्डाने दिलेल्या वेळेनुसार उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण करण्याकडे सध्या परीक्षक आणि नियामक गुंतलेले आहेत. मात्र त्यांना पेपरतपासणीबरोबरच बीएलओची कामे, मदरशांचे सर्वेक्षण, पेंद्र संचालनाची कामे, शालेय वार्षिक परीक्षांचे सुपरव्हिजनही करायचे आहे. त्यातच बोर्डाने उत्तरपत्रिका तपासणीचे काम वेळेत पूर्ण करण्यास प्रथम प्राधान्य देण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. त्यामुळे शिक्षक हवालदिल झाले आहेत.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुंबई विभागीय शिक्षण मंडळाने परिपत्रक जारी केले असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निकालाचे काम 45 दिवसांच्या आता पूर्ण करणे आवश्यक असल्याने परीक्षक व नियामकांना इतर कोणतेही काम देऊ नये, अशा सूचना मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात असे घडत नसल्याचा काही शिक्षकांचा आरोप आहेत. पेपर तपासणीच्या काळातच अनेक इतर अशैक्षणिक कामांचा बोजा डोक्यावर असून त्यातून कोणतीही सूट मिळत नाही, असे शिक्षकांचे म्हणणे आहे.
सरकारी अधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांनीच प्राथमिकता ठरवून शिक्षकांना केवळ शैक्षणिक कामेच करू द्यावीत.
– जालिंदर सरोदे, कार्याध्यक्ष, राज्य शिक्षक सेना
बोर्डाच्या पेपरतपासणीचे काम महत्त्वाचे आहेच त्याचबरोबर शाळेच्या दैनंदिन कामही तितकेच महत्त्वाचे आहे. शिक्षकांनरा 100 टक्के सूट देणे मुख्याध्यापकांना परवडणारे नाही. त्यामुळे बोर्ड, मुख्याध्यापक आणि शिक्षक या तिघांनीही समन्वय साधत सर्वच कामे मार्गी कशी लागतील हे पाहणे महत्त्वाचे आहे.
– महेंद्र गणपुले, राज्य प्रवक्ता, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List