पाकिस्तानवर हल्ला करताच मुंबईच्या किनारपट्टीवर मोठ्या हालचाली, मोठी अपडेट काय?
ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर भारताने हल्ला केल्यानंतर पाकिस्तान चवताळला असून दोन दिवसांपासून पाकने भारतावर हल्ला सुरू केला आहे. मात्र भारताने पाकचे सर्व प्रयत्न हाणून पाडले असून भारताने पाकिस्तानच्या प्रमुख शहरांवर तीव्र हल्ला केला. इस्लामाबाद ते कराची, लाहोरपर्यंत भारताने हल्ला केल्याने पाकची अवस्था पळता भुई थोडी अशी झाली आहे. पाकच्या कुरापती कायम असून पाकिस्तानविरुद्धचं युद्ध सुरू झाल्याने भारतानेही महत्वाचा निर्णय घेत देशभरात अलर्ट जारी केला आहे.
भारताने सीमावर्ती भागात ब्लॅकआऊट केला आहे.पंजाब, अंबाला, राजस्थान आणि हरियाणातील गावांना ब्लॅक आऊट करण्यात आला.देशभरातील महत्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणांच्या सुरक्षिततेमध्ये वाढ करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या किनारपट्टी भागाच्या सुरक्षेत तसेच गस्तीत वाढ करण्यात आली आहे. संवेदनशील भागांमध्ये सीसीटीव्ही, ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे.
भारत व पाकिस्तानातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील किनारपट्टी परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. त्या अंतर्गत मुंबई पोलिसांनी भारतीय तटरक्षक दलाच्या समन्वयाने समुद्रकिनारे, बंदरे, गोदी आणि समुद्रमार्ग यांसह सर्व किनारपट्टी भागांमध्ये गस्त वाढवली आहे. तसेच संवेदनशील भागांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनच्या माध्यमातून सर्वत्र लक्ष ठेवण्यात येत आहे.
‘सागरी कवच’ तटरक्षक मोहीम सुरू
महत्वाची बाब म्हणजे, भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी ‘सागरी कवच’ ही व्यापक तटरक्षक मोहीम सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमाअंतर्गत सागरी गस्त वाढवण्यात आली आहे. तसेच, मच्छीमारांना सतर्क राहण्यास आणि बोटींच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणतीही अनधिकृत व्यक्ती समुद्रामार्गे प्रवेश करू नये, यासाठी मच्छीमार बोटींच्या सर्व प्रवेश आणि जाण्याच्या मार्गांवर तपासणी वाढवण्यात आली आहे. या सर्व उपाययोजना सुरक्षेच्या दृष्टीने करण्यात येत आहेत.
सिद्धीविनायक मंदिराचा मोठा निर्णय
भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सतर्कता बाळगली जात आहे. दरम्यान मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरानेही आता मोठा निर्णय घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर प्रशासनाने नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार, मंदिरात येणाऱ्या भाविकांना आता गणरायासमोर हार आणि नारळ अर्पण करण्यास मनाई करण्यात आली आहे. भाविकांची सुरक्षा महत्वाची असून खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List