माझ्या आत्महत्येला सरकार जबाबदार! युवा पुरस्कारप्राप्त शेतकऱ्याची आत्महत्या, सणाच्या दिवशीच मृत्यूला कवटाळले

माझ्या आत्महत्येला सरकार जबाबदार! युवा पुरस्कारप्राप्त शेतकऱ्याची आत्महत्या, सणाच्या दिवशीच मृत्यूला कवटाळले

खडकपूर्णा धरणातून शेतीसाठी पाणी मिळावे यासाठी राज्य सरकारने शब्द दिला होता. परंतु सरकारने विश्वासघात केला. सरकारच्या या नाकर्तेपणाच्या निषेधार्थ युवा पुरस्कारप्राप्त शेतकऱ्याने विष घेऊन आत्महत्या केली. माझ्या आत्महत्येस सरकार जबाबदार असल्याचे या शेतकऱ्याने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.

देऊळगावराजा तालुक्यातील शिवनी आरमाळ येथील युवा पुरस्कारप्राप्त शेतकरी कैलास अर्जुनराव नागरे यांनी खडकपूर्णा धरणातून शेतीसाठी पाणी मिळावे यासाठी लढा सुरू केला होता. पाण्यासाठी नागरे यांनी दोन ते तीन वेळा आंदोलनही केले. या मागणीसाठी सरकार दरबारी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. डिसेंबरमध्ये एक आठवडा अन्नत्याग आंदोलनही केले. त्यावेळी सरकारच्या वतीने कैलास नागरे यांना मागणीची पूर्तता करण्याचे आश्वासन देण्यात आले, मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नाही.

सरकार फक्त शब्द देते, तो पाळत नाही हे वारंवार दिसून आल्याने कैलास नागरे अस्वस्थ होते. 26 जानेवारी रोजीही त्यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. परंतु पालकमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून त्यांनी उपोषण स्थगित केले. पालकमंत्र्यांनी शब्द देऊन दोन महिने उलटून गेले तरी पाणी देण्यासंदर्भात काहीही हालचाली होत नसल्यामुळे 13 मार्च रोजी ऐन होळीच्या दिवशीच कैलास नागरे यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली.

तीन पानांची सुसाईड नोट

कैलास नागरे यांनी आत्महत्या करण्यापुर्वी तीन पानांची सुसाईड नोट लिहून ठेवली. शेतीसाठी सर्व सुविधा असूनही पाणी मिळत नाही. प्रशासन आणि सरकारने वारंवार शब्द देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. निदान माझ्या आत्महत्येनंतर पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना पाणी मिळाल्यास माझे बलिदान सार्थ ठरेल असे या चिठ्ठीत म्हटले आहे.

ग्रामस्थांचा संताप अंत्यसंस्कारास नकार

शासन जोपर्यंत ठोस लेखी आश्वासन देत नाही, तोपर्यंत कैलास नागरे यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होणार नाहीत, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. परिणामी गावात संतापाची लाट उसळली असून तणावाचे वातावरण निर्माण झाले. खडकपूर्णा धरणाच्या डाव्या कालव्यामधून शेतीसाठी पाणी सोडण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारने तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

“मी त्या शेतकऱ्याबद्दल माहिती घेतली. तो आदर्श शेतकरी होता. पाण्यासाठी त्याने आंदोलनेही केली होती. परंतु त्याचे प्रबोधन करण्यात शासन, लोकप्रतिनिधी कमी पडले का, याचा विचार करावा लागेल. मात्र जाणीवपूर्वक दिरंगाई झाली असेल तर दोषी अधिकाऱ्यांवर निश्चित कारवाई करण्यात येईल.”

माणिकराव कोकाटे, कृषिमंत्री

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;