मिंधे नाकर्ते आहेत हे वारंवार सिद्ध झालंच होतं, आज त्यावर शिक्कामोर्तब झालं! आदित्य ठाकरे यांचा घणाघात
आजपासून राज्याच्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मिंधे सरकाराच्या कार्यकाळातील घोटाळे समोर येण्यास सुरुवात झाली आहे. यातच आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणत्याही अडचणीच्या प्रश्नाचा सामना करावा लागू नये म्हणून स्वतःकडील खात्यांच्या उत्तरांची जबाबदारी घाईघाईने इतर मंत्र्यांवर सोपवली. यावरूनच आता शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मिंधेंवर टीका केली आहे. मिंधे नाकर्ते आहेत हे वारंवार सिद्ध झालंच होतं, आज पुन्हा एकदा त्यावर शिक्कामोर्तब झालं, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
X वर एक पोस्ट करत आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की, ”आज विधानसभेत उपमुख्यमंत्री मिंधे यांनी स्वतःला उत्तरं द्यावी लागू नयेत, म्हणून किंवा लोकप्रतिनिधींचा जाणून बुजून अपमान करायचा म्हणून, स्वतःकडील खात्यांच्या उत्तरांची जबाबदारी घाईघाईने इतर मंत्र्यांवर सोपवली.” ते म्हणाले, ”देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री असताना किंवा आता मुख्यमंत्री असतानाही स्वतः प्रश्नोत्तरांना उभे राहतात. अजित दादाही स्वतः प्रश्नांची उत्तरे देतात, पण काहींकडे मात्र उत्तरंच नसल्याने किंवा लोकप्रतिनिधींना तोंड देण्याची क्षमताच नसल्याने स्वतःवरची जबाबदारी झटकण्याची वेळ आलीये.”
आदित्य ठाकरे म्हणाले, ”मिंधे नाकर्ते आहेत हे वारंवार सिद्ध झालंच होतं, आज पुन्हा एकदा त्यावर शिक्कामोर्तब झालं. माझा सवाल मुख्यमंत्र्यांना आणि दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना आहे की, अशा विधीमंडळाचा, लोकप्रतिनिधींचा अपमान करणाऱ्या अकार्यक्षम व्यक्तीसोबत बाकांवर बसणं कसं सहन होतं?” मंत्री योगेश कदम यांच्यावर टीका करत महायुती सरकारवर संताप व्यक्त करत आदित्य ठाकरे म्हणाले, ”ज्या राज्यात बलात्कार शांततेत पार पडला, अशा प्रकारचे भयंकर उद्गार काढणाऱ्या मंत्र्यांना पदावरुन काढून न टाकता अभय दिले जाते. त्या मंत्रीमंडळाकडून जनता काय अपेक्षा ठेवणार? सक्षम मंत्रीमंडळ असते तर, तातडीने अशा मंत्र्यांची हकालपट्टी केली असती”, असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
आज विधानसभेत उपमुख्यमंत्री मिंधे ह्यांनी स्वतःला उत्तरं द्यावी लागू नयेत म्हणून किंवा लोकप्रतिनिधींचा जाणून बुजून अपमान करायचा म्हणून, स्वतःकडील खात्यांच्या उत्तरांची जबाबदारी घाईघाईने इतर मंत्र्यांवर सोपवली.
देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री असताना किंवा आता मुख्यमंत्री असतानाही…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) March 3, 2025
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List