पेटंट मुख्यालयाचे स्थलांतरण: मुंबईचं महत्व कमी करणं हाच यांचा उद्देश! आदित्य ठाकरेंनी फटकारले
देशविदेशातील कंपन्यांना गेल्या 53 वर्षांपासून पेटंट देणाऱ्या मुंबईतील पेटंट विभागाचे मुख्यालय दिल्लीतील द्वारका येथे हलविण्यात आले आहे. मंगळवार 25 फेब्रुवारीपासून दिल्लीत हे कार्यालय सुरू झाल्याचे उद्योग विभागाकडून सांगण्यात आले. पेटंट विभागातील काही मोजके अधिकारी मुंबईतील अँटॉप हिल येथील कार्यालयात काम करणार असून मुख्य व्यवस्थापकांची दिल्ली येथे बदली करण्यात आली आहे. त्यामुळे आता ज्या कंपन्यांना पेटंट घ्यायचे असेल त्यांना मुंबई ऐवजी दिल्लीतील कार्यालयात जावे लागणार आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारला फटकारले आहे.
मुंबईतील पेटंट विभाग हा केंद्रीय वाणिज्य उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारित येतो. या विभागाचे मुख्यालय गेल्या 53 वर्षांपासून मुंबईतील अँटॉप हिल येथे आहे. या कार्यालयाच्या अंतर्गत दिल्ली, चेन्नई, कोलकाता, अहमदाबाद, नागपूर येथील कार्यालयाचा कारभार पाहिला जात होता. आता हेच मुख्यालय दिल्लीतील द्वारका येथे हलविण्यात आले आहे.
यावरून आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे. ”शेवटी खोटं बोलून, रेटून पुन्हा ह्यांनी तेच केलं… मुंबईचं महत्व कमी करणं हाच यांचा उद्देश आहे”, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List