‘मणिपूरची जनता तुमची भेट घेण्यास आतूर, आमंत्रण स्वीकारा!’, विरोधकांचे पंतप्रधान मोदींना पत्र
गेल्या दोन वर्षांपासून मणिपूर धूमसते आहे. इथल्या नागरिकांची परिस्थिती गंभीर आहे. असं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मणिपूरमध्ये भेट देण्यासाठी, नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी गेलेले नाहीत. यावरून केंद्रातील विरोधी पक्षात असलेल्या INDIA ब्लॉकने शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून संघर्षग्रस्त मणिपूरला भेट देण्याची विनंती केली आणि त्यांच्यासमोर मागण्या मांडल्या आहेत.
या पत्रात विरोधकांनी म्हटलं आहे की, पर्वतीय राज्यातील लोक पंतप्रधान मोदी यांच्यासमोर ‘आपल्या असहाय्यतेचा आवाज’ ठेवण्यासाठी ‘आतुरतेने वाट पाहत आहेत’.
या पत्रात म्हटले आहे की, ‘आम्ही, मणिपूरच्या लोकांच्या वतीने आणि INDIA ब्लॉक मणिपूरच्या वतीने तुम्हाला आमंत्रित करत आहोत. आमचे राज्य, 3 मे, 2023 पासून म्हणजेच सुमारे 2 वर्षांपासून अशांततेत आहे. तेव्हा मणिपूरला तुम्ही भेट द्यावी म्हणून आमंत्रित करत आहोत’.
पत्रातून ईशान्येकडील राज्यातील अत्यंत गंभीर परिस्थितीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. विरोधकांनी जोर दिला की ‘अशांततेने संपूर्ण राज्य उद्ध्वस्त झाले आहे आणि सुमारे एक लाखाहून अधिक लोक राज्यात विविध ठिकाणी विस्थापित झाली आहेत आणि शेकडोंनी प्राण गमावले आहेत’.
सततच्या हिंसाचारामुळे मणिपूरच्या लोकांमध्ये वेदना, आघात, भीतीचे वातावरण असल्याचा उल्लेख देखील करण्यात आला आहे. अशांतता आणखी वाढल्याचेही या पत्रात म्हटले आहे.
मणिपूरमध्ये शांतता आणि सामान्य स्थिती पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपायाचा एक भाग म्हणून विरोधकांनी पंतप्रधान मोदींसमोर मागण्या ठेवल्या आहेत.
पंतप्रधान मोदींनी लवकरात लवकर आणि 2024 संपण्यापूर्वी मणिपूरला भेट द्यावी, या मागण्यांचा समावेश या पत्रात आहे. पंतप्रधानांना मणिपूरला येण्यास वेळ नसल्यास इथल्या सर्व राजकीय पक्षांना त्यांच्या अधिकृत निवासस्थानी आमंत्रित करण्याचा पर्यायही यामध्ये दिला आहे.
आपल्या मागणीत, ‘मणिपूर INDIA ब्लॉकने म्हटले आहे की पंतप्रधानांनी मणिपूरच्या लोकांशी थेट भेटून संवाद साधल्यानंतरच इथे शांतता प्रस्थापित होण्यास मदत होईल. तेव्हा मणिपूरचे लोक तुम्हाला मणिपूरच्या मातीवर भेटण्यास आतुर आहेत’, असे या पत्रात म्हटले आहे.

गेल्या महिन्यात मणिपूरमध्ये मंत्री आणि आमदारांच्या घरांवर झालेल्या हल्ल्यांसह हिंसाचाराचा एक नवीन प्रकार पाहायला मिळाला. संघर्षग्रस्त जिरीबाममधील बराक नदीत तीन महिला आणि तीन मुले – सहा मृतदेह सापडल्यानंतर हिंसाचार सुरू झाला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List