लिव्हर दान करत तिनं मला वाचवलं, आता तिच नाही राहिली; ‘पुष्पा-2’च्या प्रीमियरवेळी चेंगराचेंगरी, महिलेचा मृत्यू, पतीचा आक्रोश
दक्षिणेतील सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन याचा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित ‘पुष्पा-2’ हा चित्रपट गुरुवारी प्रदर्शित झाला. या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ पहायला मिळत आहे. पहिल्याच दिवशी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये तुफान गर्दी पहायला मिळाली. जवळपास सर्वच शो हाऊसफुल्ल झाले. मात्र याच हीच क्रेझ हैदराबाद येथील 35 वर्षीय रेवती हिच्या जिवावर बेतली आहे.
हैदराबाद येथील आरटीसी चौकातल्या संध्या थिएटरमध्ये बुधवारी सायंकाळी ‘पुष्पा-2’ चित्रपटाचा प्रीमियर आयोजित करण्यात आला होता. स्क्रिनिंगदरम्यान आलेल्या अल्लू अर्जुन आणि संपूर्ण चित्रपटाच्या टीमला पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी चेंगराचेंगरीत एका रेवती हिचा मृत्यू झाला.
या गर्दीत तिचा 9 वर्षांचा मुलगा श्रीतेज हा देखील गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर हैदराबादमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पत्नीचा मृत्यू आणि मुलाचीही मृत्युशी झुंज सुरू असल्याने मोगाडंपल्ली भास्कर यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पत्नीच्या मृत्युनंतर मोगाडंपल्ली यांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकत होता. या घटनेबाबत भरल्या डोळ्यांनी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
तीन वर्षांपूर्वी आलेल्या ‘पुष्पा – द राईज’ या चित्रपटानंतर माझ्या मुलाला शेजारी राहणारे पुष्पा नावाने हाक मारायला लागले. तो अल्लू अर्जुनचा मोठा फॅन आहे, असे 40 वर्षीय मोगाडंपल्ली यांनी सांगितले. पत्नीबाबत बोलतानाही ते भावूक झाले. तिने माझे आयुष्य वाचवले आणि आता तिच आम्हाला सोडून गेली, असे ते म्हणाले. रेवतीने 2023 मध्ये मोगाडंपल्ली यांना लिव्हर दान केले होते. त्यामुळे त्यांना जीवदान मिळाले होते. मात्र अवघ्या काही महिन्यात तिच त्यांना सोडून गेली.
श्रीतेज आणि त्याची लहान बहीण सानवी हिने आई-वडिलांना ‘पुष्पा-2’ चित्रपटाचा प्रीमियर पहायला जायचेच अशी गळ घातली होती. अल्लू अर्जुन येणार म्हणून सर्वच खुश होते. आम्ही संध्या थिएटरला वेळेत पोहोचलो. गर्दीमुळे तिथे चेंगराचेंगरी झाली आणि त्यात रेवती व श्रीतेज अडकले. सानवी रडत असल्याने मोगाडंपल्ली तिला घेऊन आधीच बाहेर पडले होते. त्यांना तिला थिएटरजवळ असलेल्या नातेवाईकांच्या घरी सोडले. तिला सोडून आल्यानंतर त्यांना थिएटरमध्ये चेंगराचेंगरी झाल्याचे कळला. धावत त्यांनी थिएटर गाठले. रेवती आणि श्रीतेज त्या गर्दीत अडकले होते. त्यावेळी तिचा आवाज शेवटचा ऐकला, असे मोगाडंपल्ली यांनी सांगितले. चेंगराचेंगरीवेळी रेवतीने श्रीतेजला वाचवले, मात्र तिचा मृत्यू झाला. श्रीतेजवर सध्या हैदराबाद येथील गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या फुफ्फुसाला गंभीर दुखापत झाली आहे.
थिएटरमध्ये नक्की काय घडले?
प्रीमियरला अल्लू अर्जुन स्वत: येणार असल्याने तुफान गर्दी झाली होती. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीमुळे अनेक जण एकमेकांवर पडले. काही लोक जखमीही झाले. या घटनेचे अनेक व्हिडीओही समोर आले आहेत. यामध्ये अल्लू अर्जुनचे चाहते बेशुद्ध अवस्थेत दिसले. घटनास्थळी तैनात असलेल्या सुरक्षा आणि पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या परिस्थिती हाताळण्यासाठी तोकडी होती. दरम्यान, वाढत्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तसेच सौम्य लाठीचार्जसुद्धा करावा लागला. प्रचंड गर्दीमुळे थिएटरचा गेटदेखील ढासळला.
अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल
दरम्यान, संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुन याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी कलम 105, 118(1) अ्वये गुन्हा दाखल केला असून अल्लु अर्जुनने यावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List