सांगलीत वटवाघळांनी दहा टन द्राक्षे केली फस्त, शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवला
सांगलीत वटवाघळांनी एका रात्रीत दहा टन द्राक्षे फस्त केल्याने सांगलीत एकच खळबळ माजली. रात्रीच्या वेळी वटवाघळांच्या झुंडीने बागेवर हल्ला चढवत शेतकऱ्याचे मोठे नुकसान केले. विक्रीसाठी तयारी झालेल्या द्राक्षाच्या बागेची नासधूस झाल्याने विठ्ठल पाटील या शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले. तासगाव तालुक्यातील हातनूर येथे ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानीचा पंचनामा केला.
हंगामाच्या सुरुवातीला चांगला भाव मिळेल या आशेने पाटील यांनी एक एकर सुपर सोनाका जातीच्या द्राक्ष बागेची आगाप फळछाटणी हाती घेतली होती. अशातच सोमवारी वटवाघळांनी बागेवर हल्ला केल्याने त्यांच्या तोंडचा घास गेल्याचे चित्र निर्माण झाले. येत्या चार दिवसांत माल विक्रीसाठी जाईल अशी स्थिती होती, पण सुमारे आठ ते दहा टन माल निघेल अशी शक्यता असतानाच वटवाघळांनी द्राक्षे फस्त केली. तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांसह ग्रामसेवक, तलाठी यांनी नुकसानीची पाहणी करून पंचनामा केला. पीडित शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळावी यासाठी पंचनाम्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List