राजकारणापलीकडे जाऊन वायनाडमधील पीडितांना मदत करा, प्रियांका गांधी यांचे गृहमंत्री अमित शहा यांना आवाहन
वायनाडमधील भूस्खलनाचा लोकांवर मोठा परिणाम झाला आहे. लोकांची कुटुंबे आणि घरे उद्ध्वस्त झाली आहेत. त्यांच्याकडे कुठलाही आधार उरलेला नाही. अशा स्थितीत केंद्र सरकारने काहीच केले नाही तर लोकांनी कुणाकडून अपेक्षा करायची. त्यामुळे राजकारणापलीकडे जाऊन वायनाडच्या लोकांना मदत करा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना केल्याचे वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी यांनी सांगितले. वायनाडमधील नैसर्गिक आपत्तीप्रकरणी प्रियांका गांधी यांनी आज गृहमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दरम्यान, आपल्याला तेथील लोकांच्या समस्या माहीत आहेत, सरकारकडून शक्य तितकी मदत दिली जाईल, असे आश्वासन गृहमंत्र्यांनी दिल्याचे प्रियांका यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा तेथील पीडितांची भेट घेतली होती तेव्हा लोकांच्या मनात मदतीबद्दल आशा जागृत झाली होती, परंतु आजपर्यंत कुठल्याही प्रकारची मदत त्यांना मिळालेली नाही, असेही प्रियांका गांधी म्हणाल्या. काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी-वढेरा यांनी केरळमधील लोकसभा सदस्यांसह गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले. संसद भवन संकुलातील शहा यांच्या कार्यालयात ही बैठक झाली. या बैठकीदरम्यान केरळमधील काँग्रेस, आययूएमएल आणि आरएसपीचे खासदारही उपस्थित होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List