मोदींच्या परराष्ट्र धोरणामुळे जगभरातील हिंदू धोक्यात, संजय राऊत यांचा घणाघात
बांगलादेशमधली हिंदूंची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. पण तिथे त्यांना असुरक्षित करण्यामागे नरेंद्र मोदींचं परराष्ट्र धोरण जबाबदार आहे, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी बांगलादेशमध्ये हिंदूंवर सुरू असलेल्या अत्याचारावरून भाजप व मोदी-शहांना फटकारले आहे.
”जगातला किंवा देशातला हिंदू संकटात आहे तो नरेंद्र मोदी, अमित शहा व भाजपच्या राजकीय स्वार्थामुळे. त्याला सुप्रीम कोर्टाचे सरन्यायधीश धनंजय चंद्रचूड यांनी फूस लावली. देशात निवडणूका जिंकण्यासाठी जी ठिणगी टाकली. त्याचा परिणाम ज्या ज्या भागात हिंदू मोठ्या प्रमाणात आहेत त्यांच्यावर होतोय. नेपाळ, कॅनडामध्ये हल्ले झाले. बांग्लादेश पाकिस्तानमध्ये देखील हिंदूंवर अत्याचार होतायत. याला जबाबदार नरेंद्र मोदींचे निवडणूका जिंकण्यासाठी धोरणं आहेत. हिंदुस्थानात सातत्याने दंगे घडवायचेय, मुसलमानांना टार्गेट करायचं. प्रार्थनास्थळं शोधण्यासाठी खोदकामाला प्रोत्साहन द्यायचं. त्याचा उलटा परिणाम इतर देशातील हिंदूंवर होतोय. नरेंद्र मोदी व भाजप मध्ये इतकी ताकद नाहीए की बांग्लादेशमध्ये जाऊन हिंदूंवरील अत्याचार थांबवावतील. 1971 मध्ये पूर्व पाकिस्तानात हिंदूंवर अत्याचार होत होते. तेव्हा इंदिरा गांधींनी पाकिस्तानावर हल्ला चढवला व तिथल्या हिंदूंना संरक्षण दिलं. पाकिस्तानचे दोन तुकडे करून बांगालदेश निर्माण केला. तुमच्यात ती हिंमत आहे का?, असा सवाल संजय राऊत यांनी भाजपला व नरेंद्र मोदींना केला.
”काश्मीरी पंडित, मणिपूरमधला हिंदू सुरक्षित नाही आणि भाजप हिंदूंच्या नावावर मतं मागते. या देशात सगळ्यात जास्त हिंदूंना धोका कोणापासून असेल तर तो भाजपपासून आहे. साबरमती एक्स्प्रेसला आग कोणी लावली, गोध्रा कोणी केलं. असे अनेक प्रकरणं मला सांगता येतील. कोणी काय केलं कशासाठी केलं. त्याचे परिणाम देश भोगतोय. या देशातली धार्मिक एकता संपली आहे. या देशातली लोकशाही, संविधान संपले आहे. या देशात बटेंगे तो कटेंग, एक है तो सेफ है या घोषमांमुळे तरुणांची डोकी भडकवली गेली. संपूर्ण देशात दंगलीचा माहोल निर्माण करण्यात आलेला आहे, असे संजय राऊत म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List