सरकार स्थापनेत विलंब हा महाराष्ट्राचा अवमान, आदित्य ठाकरे यांचे टीकास्त्र
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला तरी अद्याप मुख्यमंत्री न ठरणे आणि सरकार स्थापन न होणे हा महाराष्ट्राचा अवमान आहे, असे टीकास्त्र शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज सोडले. महायुतीला मदत करणाऱया निवडणूक आयोगाचाही हा अवमान आहे, असेही ते म्हणाले.
आदित्य ठाकरे यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये महायुती आणि काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. नियम फक्त विरोधी पक्षांना लागू होतात, काही विशेष लोकांसाठी नियमच लागू होत नाहीत, असे नमूद करतानाच, सरकार स्थापनेचा दावा न करता आणि माननीय राज्यपालांना संख्याबळ न दाखवता एकतर्फी शपथविधीची तारीख जाहीर करणे म्हणजे शुद्ध अराजकता आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर उपहासात्मक टीका केली आहे. केअरटेकर सीएम चंद्राच्या कलेप्रमाणे लहान सुट्टीवर आहेत, आम्ही यापूर्वीदेखील नियमितपणे त्याचे निरीक्षण केले आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. भारतीय जनता पक्षाबाबात बोलताना त्यांनी नमूद केले की, ‘जे सरकार स्थापन करू शकतील त्यांच्यासाठी महाराष्ट्राला प्राधान्य नाही, ते त्यांच्या दिल्ली सहलीचा आनंद घेत आहेत. राष्ट्रपती राजवट? ते आत्तापर्यंत असायला हवे होते ना? निर्णय प्रलंबित असताना विरोधकांकडे संख्याबळ असते तर असे झाले नसते का? असं असलं तरी निवडणूक आयोगाच्या आदेशामुळे अखेरीस ज्याला शपथ दिली जाईल त्याचे अभिनंदन.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List