मोदींच्या राजवटीत फक्त अदानीच सेफ; प्रियंका गांधी यांचा जोरदार हल्ला

मोदींच्या राजवटीत फक्त अदानीच सेफ; प्रियंका गांधी यांचा जोरदार हल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘एक है तो सेफ है’चा नारा देत आहेत, पण मोदींच्या 11 वर्षांच्या राजवटीत देशातील शेतकरी, कामगार, महिला किंवा तरुण कुणीही सेफ नाही. जर कुणी सेफ असेल तर ते फक्त उद्योगपती अदानीच आहेत, अशा शब्दांत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी आज भाजप आणि मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. गडचिरोलीच्या वडसा येथील जाहीर सभेत त्या बोलत होत्या.

प्रियंका गांधी पुढे म्हणाल्या, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशाचे हित पाहून मोठय़ा संस्था, कारखाने, बंदरे, शैक्षणिक संस्था आणि रुग्णालये विविध राज्यांमध्ये उभी केली. विकास करताना काँग्रेस सरकारने कधीच भेदभाव केला नाही, परंतु गेल्या 11 वर्षांपासून देशात भेदभावाचेच राजकारण सुरू आहे. मोदी सरकारने महाराष्ट्रात येणारे मोठे प्रकल्प गुजरात आणि इतर राज्यांत पळवून महाराष्ट्राशी भेदभाव केला. देशातील सर्व विमानतळे, बंदरे, कारखाने आणि जमिनी एकाच उद्योगपतीला दिली. महाराष्ट्रात प्रचंड बेरोजगारी वाढली असून अडीच लाख सरकारी पदे रिक्त आहेत. कंत्राटी पद्धतीने नोकरभरती केली जात आहे. तरुणांच्या, शेतकऱयांच्या आत्महत्या होत आहेत याकडे प्रियंका गांधी यांनी लक्ष वेधले. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, गडचिरोलीच्या संपत्तीची लूट सुरू असून ती थांबवली पाहिजे. मविआचे सरकार आल्यानंतर गडचिरोलीत रोजगार निर्मिती करणारे उद्योग उभे केले जातील, तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप धोक्यात असल्यावरच त्यांना हिंदूंची आठवण येते व ‘हिंदू खतरे में है’, ‘बटेंगे कटेंगे’ अशा धमक्या देत आहेत, याकडे लक्ष वेधले.  सभेला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भुपेश बघेल, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार नामदेव किरसान, प्रदेश उपाध्यक्ष संघटन आणि प्रशासन नाना गावंडे, रिपाईचे नेते राजेंद्र गवई, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित होते.

शेतमालाला भाव नाही

शेतकऱयांच्या शेतमालाला भाव मिळत नाही. कापसाची मोठय़ा प्रमाणात आयात करून शेतकऱयांच्या कापसाचे भाव वाढू दिले नाहीत. दहा वर्षांपासून सोयाबीनचा दर वाढलेला नाही. काँग्रेस सरकार असताना सोयाबीनला सात ते आठ हजार रुपये भाव होता. आज तो फक्त चार हजार रुपये आहे. कांदा निर्यातबंदी केल्यामुळे 50 लाख टन कांदा बाद झाला. दुधाला भाव नाही, संत्र्याला भाव नाही. शेतकऱयांचे उत्पन्न वाढत नाही आणि शेती साहित्यावर मात्र जीएसटी लावून शेतकऱयाला लुटले जात आहे. शाळेसाठी लागणाऱया वस्तूंवर जीएसटी लावला आहे, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.

आदिवासींवर अत्याचार

आदिवासींचे हक्क अबाधित राखण्यासाठी काँग्रेस सरकारने पेसा कायदा बनवला. आज भाजपच्या राज्यात आदिवासींवर अत्याचार होत आहेत. महाराष्ट्रातील चार लाख आदिवासींनी जमीन पट्टय़ांसाठी अर्ज केले. त्यातील दोन लाख बाद करण्यात आले, तर देशभरातून 22 लाख आदिवासींचे अर्ज बाद केले, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;