शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही; शरद पवार यांनी महायुती सरकारला फटकारले
राज्यातला शेतकरी सध्या संकटात आहे. त्यांच्याकडे सरकारचे लक्ष नाही. जो शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही, त्यांना सत्तेत बसण्याचा अधिकार नाही, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी उदगीर मधील जाहीर सभेत केला आहे. राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. बदलापूर सारखी घटना राज्यात होत आहे. एका चिमुकलीवर तिथे अत्याचार झाले. हजारो मुली गायब झाल्या आहेत. त्यांचा पत्ता लागत नाही. तरीही या सरकारला काही पडले नाही. सत्ताधारी पक्षातला आमदार पोलीस ठाण्यात जात गोळीबार करतो. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती काय आहे हे समजते. त्यामुळे राज्य महाविकास आघाडीच्या हातात द्या, या महाराष्ट्राचा चेहरा बदलू टाकू, असे आश्वासन शरद पवार यांनी दिले.
लोकसभा निवडणुकीत मोदींनी 400 पारचा नारा दिला होता. त्यावेळी आमच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती.चारशे जागा जिंकल्यावर त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला बदलायचे होते. त्यावर संस्कार करायचे होते. मात्र महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांचा हा डाव उधळवून लावला. मोदींना त्यांची जागा तुम्ही दाखवून दिली, असेही ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीवेळी शेतकरी अस्वस्थ होता. त्याला काही तरी बदल हवा होता. मोदींच्या मनात मात्र वेगळ्या गोष्टी सुरू होत्या. त्यावेळी राहुल गांधींच्या नेतृत्वात देशात इंडिया आघाडीने आकार घेतला. मोदी 400 पारचा नारा देत होते. त्यावेळी काही तरी गडबड असल्याचे जाणवले. त्यानंतर त्यांच्या मनात संविधान बदलण्याचा डाव सुरू असल्याचे समोर आले. चारशे जागा मिळाल्या असत्या तर त्यांना संविधानावर संस्कार करायचे होते. त्यांनी तसे केले असते तर सर्वांच्याच मुलभूत अधिकारांवर मर्यादा आणण्याचे काम होणार होते. मात्र मोदींचे हे मनसूबे महाराष्ट्रातल्या जनतेने उधळवून लावले. महाराष्ट्रातल्या जनतेने मोदींना त्यांची जागा दाखवून दिली, असेही शरद पवार म्हणाले.
गेली 10-15 वर्ष भाजप विचारांचे सरकार राज्यात आहे. अनेक प्रश्न राज्यात आहेत. हे राज्य उद्योग, शेती या क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर होते. तेच आता सहाव्या क्रमांकावर गेले आहे. या सरकारने राज्याला शोभेल अशी कामगिरी केली नाही. या आधीच्या नेत्यांनी मग विलासराव असतील किंवा मी स्वत: असेन आम्ही राज्य सतत पहिल्या क्रमांकावर ठेवले होते. पण सध्याच्या राज्यकर्त्यांना ते जमले नाही. राज्यातले कारखाने बाहेर जात आहेत. इथल्या मुलांच्या नोकऱ्यांवर डल्ला मारला जात आहे. कांदा, साखर, सोयाबीन सारख्या पिकांच्या निर्यातीवर बंदी आणली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. ज्या सरकारला शेतकऱ्यांची काळजी नाही यांना सत्तेपासून दुर केले पाहीजे असेही शरद पवार यांनी सांगितले. महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला जात आहेत. पंतप्रधान हा देशाचा असतो. तो कधी ही कोणत्या राज्याचा प्रांताचा नसतो. पण मोदींचे वर्तन तसे आहे का? असा प्रश्न पडत आहे. त्यामुळे अशा पंतप्रधानाना सत्तेवर राहाण्याचा अधिकार कितपत आहे, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. असे शरद पवार म्हणाले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List