बंडखोरांना धमक्या ईडी मागे लावणार, भाजप आणि मिंधेंचा माघारीसाठी दबाव

बंडखोरांना धमक्या ईडी मागे लावणार, भाजप आणि मिंधेंचा माघारीसाठी दबाव

विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने भारतीय जनता पक्ष, मिंधे गट आणि अजित पवार गटामध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली. अनेक बंडखोरांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे भाजप, मिंधे आणि दादा गटाचे नेते टेन्शनमध्ये आहेत. अधिकृत उमेदवारांच्या तर हृदयाची धडधड वाढली आहे. काहीही केल्या बंडखोर ऐकत नसल्याने आता दमदाटी केली जात आहे. ईडी लावण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. भाजपने तर पक्षातून सहा वर्षे निलंबित करण्याचा इशारा दिला आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा 4 नोव्हेंबर हा अखेरचा दिवस आहे. तत्पूर्वी बंडखोरांना थंड करण्याचे अनेक मार्ग भाजप आणि मिंधे गटाने अवलंबले आहेत. पैसा, विधान परिषदेची आमदारकी, महामंडळावर नियुक्ती, पुढच्या निवडणुकीत कुटुंबातील सदस्याला उमेदवारी अशी आमिषे दाखवली गेली आहेत. त्यानंतरही न वदलेल्या बंडखोरांनी भाजप, मिंधे, अजितदादांच्या नाकीनऊ आणले आहेत. शेवटचा पर्याय म्हणून त्यांना कारवाईच्या धमक्या दिल्या जात असल्याचे दिसून येते.

माघार न घेणाऱ्यांची हकालपट्टी करू – बावनकुळे

भाजपमधील ज्या बंडखोरांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरले त्यातील 99 टक्के लोक अर्ज मागे घेतील असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. उमेदवारी मागे घेणार नाहीत त्यांच्यावर कारवाई होईल.

गोपाळ शेट्टींचे संपूर्ण आयुष्य भाजपमध्ये गेले आहे. ते उद्या दुपारी 3 पर्यंत विचार करून पक्षासाठी योग्य तो निर्णय घेतील, असे बावनकुळे म्हणाले. एक-दोन टक्के ठिकाणी बंडखोर माघार घेण्यास तयार नाहीत, पण त्यांच्याशीही आम्ही चर्चा करतोय. पक्षादेश न मानल्यास पक्षाचे दरवाजे त्यांच्यासाठी कायमचे बंद होतील, त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले जाईल, असा इशाराही बावनकुळे यांनी दिला आहे.

मिंधे गटाने अंधेरी पूर्वमधून मुरजी पटेल यांना उमेदवारी दिल्याने वादग्रस्त माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा यांनी बंडाचे निशाण हाती घेतले आहे. मालाडमध्ये भाजपच्या विनोद शेलार यांच्याविरोधात बंडखोरी करत भाजपचे ब्रिजेश सिंह यांनी अर्ज भरला आहे. मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार नरेंद्र मेहता यांच्याविरोधात महायुतीच्या गीता जैन पुन्हा अपक्ष म्हणून मैदानात आहेत. बेलापूर, वांद्रे पूर्वमध्ये मिंधे गटाचे अनुक्रमे विजय नहाटा, कुणाल सरमळकर यांनी बंडखोरी केली आहे. नंदुरबार जिह्यातील अक्कलकुवा मतदारसंघातून मिंधे गटाने विधान परिषद सदस्य आमशा पाडवी यांना उमेदवारी दिली आहे. पण भाजपच्या माजी खासदार हीना गावित यांनी बंडखोरी करून तिथे अर्ज भरला आहे.

उदगीरमध्ये अजित पवार गटाच्या संजय बनसोडे यांच्या विरोधात भाजपच्या विश्वजित गायकवाड यांनी अर्ज दाखल केला आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या परंपरागत शिर्डी मतदारसंघातून बंडखोरी करणाऱ्या राजेंद्र पिपाडा यांना भाजपच्या नेत्यांनी मुंबईत बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. अजित पवार गटातून तिकीट न मिळाल्याने समीर भुजबळ यांनी नांदगावमध्ये मिंधे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांच्याविरोधात बंडखोरी केली आहे.

मिंधे-फडणवीसांची तीन तास चर्चा

महायुती लढत असलेल्या 28 मतदारसंघांमध्ये बंडखोरी झाली आहे. ती रोखण्यासाठी आज ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुमारे तीन तास चर्चा झाली. बंडखोरांना रोखू शकलो नाही तर उद्या दिल्लीत जाऊन तोंड कसे दाखवायचे यावरून दोघेही टेन्शनमध्ये असल्याचे सूत्रांनी सांगितले. माहीममध्ये सदा सरवणकरांनी अमित ठाकरेंसाठी उमेदवारी मागे घ्यावी यावरही या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.

ईडीच्या भीतीने गोपाळ शेट्टी शरण

भाजपचे गोपाळ शेट्टी यांनी बोरिवलीतून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला होता. शेट्टी यांनी अर्ज मागे घ्यावा म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मनधरणी केली होती. तरीही शेट्टी बधले नव्हते. माघार न घेतल्यास त्यांच्यामागे ईडी लावली जाऊ शकते अशी शंका भाजपमधीलच त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केल्यानंतर गोपाळ शेट्टी शरण आले. बिनधास्त चौकशी करा, मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे असे छातीठोकपणे सांगणारे शेट्टी यांनी आज रात्री आपली उमेदवारी मागे घेतल्याची घोषणा केली. त्यावरून उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

मैदानात कोण राहणार… आज ठरणार

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या सोमवारी शेवटचा दिवस आहे. 29 ऑक्टोबरपर्यंत 7 हजार 995 उमेदवारांनी 10 हजार 905 अर्ज दाखल केले आहेत. उद्या सायंकाळपर्यंत त्यातील किती जण उमेदवारी मागे घेतात आणि किती मैदानात उरतात ते स्पष्ट होणार आहे.

बंडोबांना चार्टर्ड विमानाने नेऊन अमित शहांसमोर परेड

भाजपने बंडखोरी करणाऱ्यांना थेट केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासमोर नेऊन उभे करण्याचाही पर्याय अवलंबला आहे. आर्वी मतदारसंघात बंडखोरी करणारे भाजपचे विद्यमान आमदार दादाराव केचे यांना भाजपने चार्टर्ड विमानाने अहमदाबादला अमित शहांकडे नेऊन त्यांची समजूत घातली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;