मिंधेंनी तिकीट कापलं; डिप्रेशनमध्ये गेलेले आमदार श्रीनिवास वनगा 13 तासांपासून बेपत्ता, दोन्ही फोन स्विच ऑफ
शिवसेनेची गद्दारी करून मिंधेंच्या टोळीत गेलेले पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांचे तिकीट कापण्यात आले आहे. वनगा यांना झुलवत ठेवत ऐनवेळी मिंध्यांनी भाजपमधून आयात केलेल्या राजेंद्र गावीत यांना तिकीट दिले. तिकीट कापल्यामुळे वनगा डिप्रेशनमध्ये गेले असून गेल्या 13 तासांपासून ते बेपत्ता आहेत.
श्रीनिवास वनगा यांचे दोन्ही फोनही स्विच ऑफ येत असून कुटुंबाचा आणि त्यांचा काहीही संपर्कही झालेला नाही. त्यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढली असून श्रीनिवास वनगा नक्की कुठे गेले? ते स्वतःहून गेले? की मिधेंनी त्यांना बेपत्ता केले? असे सवाल उपस्थित होत आहेत.
श्रीनिवास वनगा हे सोमवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास एक पिशवी घेऊन घराबाहेर पडले. आपण कुठे जातोय याबाबत त्यांनीही कुणालाही काहीही सांगितले नाही. त्यानंतर 13 तास उलटून गेल्यानंतरही ते कुठे आहेत याचा थांगपत्ता लागलेला नाही. त्यांचे दोन्ही फोन स्विच ऑफ येत आहेत. त्यांच्यासोबत कोणताही संपर्क होत नसल्याचे श्रीनिवास वनगा यांच्या पत्नीने माध्यमांशी बोलताना सांगितले.
माझ्या पतीने आत्महत्या केली तर जबाबदार कोण?
आश्वासन देऊन तिकीट कापल्याने श्रीनिवास वनगा यांनी दोन दिवसांपासून स्वतःला कोंडून घेतले आहे. अन्न आणि पाणी सोडले आहे. त्यांनी आत्महत्या केल्यास कोण जबाबदार, असा सवाल श्रीनिवास यांची पत्नी सुमन वनगा यांनी केला.
वनगा मीडियासमोर अक्षरशः धाय मोकलून रडले
तिकीट कापल्यामुळे श्रीनिवास वनगा डिप्रेशनमध्ये गेले आहेत. मीडियाशी बोलतानाही त्यांना अश्रू अनावर झाले. उद्धवजी हे देवमाणूस आहेत. त्यांच्यामुळेच मी आमदार झालो. मिंध्यांसारख्या घातकी माणसासोबत गेलो आणि माझा घात झाला. मिंध्यांसोबत गेलो ही माझ्या आयुष्यातील मोठी चूक आहे, अशी कबुली वनगा यांनी दिली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List