कुणीही चालेल पण सत्ता पाहिजे, भाजपच्या ‘सत्ता जिहाद’वर उद्धव ठाकरेंची सडकून टीका

कुणीही चालेल पण सत्ता पाहिजे, भाजपच्या ‘सत्ता जिहाद’वर उद्धव ठाकरेंची सडकून टीका

अर्ध शतकाहून अधिक काळ सुरू असलेला ‘शिवसेनेचा दसरा मेळावा’ आजही तितक्याच दिमाखात आणि दणक्यात साजरा झाला. आजचा दसरा मेळावा विराट अति विराट तर होताच पण एका वेगळ्या अर्थानं ऐतिहासिक ठरला आहे. कारण शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रथमच शिवतीर्थावर भाषण केलं. अभूतपूर्व अशा दसरा मेळाव्यात गर्दीचे आजवरचे सारे विक्रम मोडीत निघाले. तर हा मेळावा म्हणजे निष्ठावंतांच अतिविराट मेळावा ठरला. या तुफान गर्दीच्या साक्षीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मिंध्यांवर जबरदस्त हल्ला चढवला. देशात फक्त आपलाच पक्ष बाकी कोणताही पक्ष नको असा विचार राबवणाऱ्या भाजपच्या कोणीही चालेल पण सत्ता पाहिजे या प्रकाराला ‘सत्ता जिहाद’ असं म्हणत अक्षरश: सालटी काढली. उद्धव ठाकरे यांच्या तडाखेबंद भाषणाला समोर उपस्थित असलेल्या जनसागराकडून तितकाच तुफान प्रतिसाद मिळत होता. शिवसेना पक्षप्रमुखांच्या भाषणाच्या शेवटी शिवसैनिकांनी त्यांच्या मागून प्रतिज्ञा करत महाराष्ट्राचा स्वाभिमान टिकवण्याच निर्धार केला…

शस्त्रपूजन व सरस्वती पूजन करत असतो. प्रत्येकाकडे वेगवेगळी शस्त्र असतात. कुणाकडे तलवार, बंदूक, मशीनगन असते पण आमच्याकडे लढवय्या मन आहे. अनेक वर्षाच्या परंपरेप्रमाणे ठाकरे कुटुंबाने आजही शस्त्त्रपूजा केली पण त्यात शिवसेना प्रमुखांच्या कुंचल्याची पूजा पहिली केली. आता तुमची पूजा करतोय कारण तुम्ही पण माझे शस्त्र आहात. ही लढाई साधीसुधी नाही. एकाबाजूला सगळे बलाढ्य अब्दाली सारखी माणसं, केंद्राची सत्ता, शासकीय यंत्रणा. तेव्हा जशा स्वाऱ्या यायच्या आणि गावच्या गावं नेस्तनाबूत केली जायची. तसाच यांनी एक मनसुबा आखला आहे. उद्धव ठाकरे आणि शिवसेनाला नेस्तनाबूत करण्याचा. पण यांना कल्पाना नाही की ही नुसती शिवसेना नाही तर ही बाळासाहेबांनी मला दिलेली वाघनखं आहेत. जर तुमचं पाठबळ मला नसतं तर मी उभाच राहू शकलो नसतो. सगळं काही ओरबाडल्या नंतरही तुम्ही आई जगदंबेसारखं माझ्या पाठिशी उभे राहिलात. त्यामुळे मला या दिल्लीकरांची पर्वा नाही. त्यांना गाडून त्यांच्या उरावर भगवा फडकवून दाखवेन. आपण मजल दरमजल करत चाललो आहोत. दरवर्षी शिवसेनेला भगवे अंकूर फुटतायत. आज जे भगवे आहेत. या भगव्यांच्या मशाली झालेल्या आहेत. इथला प्रत्येक शिवसैनिक आजपासून शिवसेनाप्रमुखांची बाळासाहेबांची मशाल बनून या भ्रष्टाचारी सरकारला चूड लावल्याशिवाय राहणार नाही., असा ठाम विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

”उद्योगपती गेल्यावर हळहळ वाटणं दुर्मिळ झालंय, कारण टाटांसारखे उद्योगपती विरळे असतात. टाटांनी अनेक गोष्टी दिल्या. रोजच्या जेवणातली लज्जत वाढवणारं मिठ दिलं. आताचे उद्योगपती अख्खं मिठागर गिळत आहे. टाटा गेल्याचं वाईट वाटतंयच पण मिठागरं गिळणारे का जात नाही याचंही वाईट वाटतंय. जे जायला पाहिजे ते जात नाही. नको ते जात आहेत. शिवसेना प्रमुख आपल्यातून गेल्यानंतर टाटासाहेब घरी आलेले आमची भेट घ्यायला. बराच वेळ बसले. निघताना म्हणाले की तुला आणि मला खूप मोठी परंपरा असलेला वारसा लाभलेला आहे. तुला शिवसेनाप्रमुखांचा तसा मला जेआरडी टाटांचा लाभलेला आहे. मी कामकाजाला सुरुवात केली तेव्हा माझ्या मनात यायचं की आज जेआरडी असते तर काय केलं असतं. त्यामुळे मी काम करूच शकत नव्हतो. तेव्हा माझ्या मनात आलं की जेआरडीनी माझी शैली बघितली, माझं काम बघितलं तेव्हा त्यांनी माझ्या खांद्यावर जबाबदारी दिली. तसंच तुझं आहे शिवसेनाप्रमुखांनी तुला बघितलं आहे. जेव्हा त्यांना खात्री पटली की तुच त्यांचा वारसा समर्थपणे नेऊ शकशील तेव्हाच त्यांनी तुझी निवड केली. त्यामुळे तुला जे योग्य वाटेल तेच तु कर. मी कुठेही बाळासाहेबांचा विचार सोडलेला नाही. भाजपला लाथ घातली कारण त्यांचं हिंदुत्व गोमुत्रधारी बुसरटलेलं हिंदुत्व आहे. त्यामुळे मी त्यांना लाथ घातली. जा मिंध्यांना सांगा की त्यांचे विचार हे बाळासाहेबांचे विचार नाही. सध्या त्यांनी एक जाहिरात केली आहे. हिंदुत्व आमचा श्वास, मराठी आमचा प्राण. पण पुढच्या दोन ओळी राहिल्या. हिंदुत्व आमचा श्वास, मराठी आमचा प्राण… अदानी आमची जान आणि आम्ही शेठजींचे श्वान. हे शेपूट हलवणारे. मी देखील श्वान प्रेमी आहे. पण लांडगा प्रेमी नाही. लांडग्यांवर प्रेम करण्याएवढं औदार्य माझं नाही. हे लांडगे वाघाचं कातडं घालण्याचा प्रयत्न करतायत. काय काय उघडं पडतंय ते त्यांना माहित नाही, असा जोरदार टोला त्यांनी मिंध्यांना लगावला.

”हे महाभारत आहे. जसे कौरव माजले होते आणि अधर्माच्या बाजूने उभे राहिले होते. कौरव शंभर होते आणि पांडव पाच होते. पण कौरवांची जी मस्ती होती की तुम्हाला सुईच्या अग्रावर मावेल एवढी देखील जमीन देणार नाही. तिच वृत्ती भाजपची आहे. या देशात कोणताही पक्ष शिल्लक राहिला नाही पाहिजे. फक्त आणि फक्त भाजप राहिला पाहिजे. मग सुईच्या अग्रावर जमिन मावली नाही तरी चालेले. पण तिच सुई तुम्हाला कुठे टोचेल ते तुम्ही लक्षात ठेवा. ज्यांनी तुम्हाला संकट काळात साथ दिली. तुम्ही त्यांना संपवायला निघालात. खरंतर हे पाप आमचं आहे जेव्हा यांना महाराष्ट्रात जेव्हा यांना कुणी विचारत नव्हतं. तेव्हा यांना महाराष्ट्रात खांद्यावर घेऊन फिरवलं. आज देखील आमची इच्छा आहे की भाजपला आम्हाला राजकारणात खांदा द्यायचा आहे. ही वृत्ती संपवावी लागेल. महाभारत मी एवढ्यासाठी म्हणालो की महाभरतात अर्जुनाला वाटत होतं की मी कुणाशी लढू. ज्यांना मी माझं मानलं तिच माणसं माझ्यावर वार करायला येतायत. कसं लढू त्यांच्यासोबत. तेव्हा कृष्णाला अर्जुनाला समजवायला लागलं. माझे आजोब सांगायचे की कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. महाभारतात अर्जुनाला वाटत होतं की मी कुणाशी लढू. ज्यांना मी माझं मानलं तिच नालायक माणसं माझ्यावर वार करायला येतायत. कसं लढू त्यांच्यासोबत. तेव्हा कृष्णाला अर्जुनाला गीता सांगावी लागली. कृष्णाने गीता सांगितली ती अर्जुनाला पण अमलात आणली ती आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी. महाराजांच्या अंगावर देखील आप्तस्वकीयच आले होते. महाराजांनी बघितलं नाही की हा कोण आहे. जो स्वराज्यावर चालून येतो तो माझा शत्रू. त्याचा शिरच्छेद केलाच पाहिजे. तशीच ही लोकं आहे. ती आपल्या अंगावर येतायत त्यांचा राजकारणातला शिरच्छेद करावाच लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांना मोदी भाजपला मतं मिळवणारं मशीन वाटतं. पण ते मशीन नाही आमचे दैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील स्वराज्यावर चालून आले त्यांचा वध केला नसता तर आपण आज नसतो. प्रभू श्री रामचंद्रांनी जसे दैत्य राक्षस मारले. तसे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील दैत्य, राक्षसच मारले. भाजप केवळ मतांसाठी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारते. नालायकांनो तुम्ही पुतळ्यात पण पैसे खाता. आपलं सरकार आल्यानंतर मी प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार. ते आमचे दैवत आहे. होय आम्ही आमच्या दैवताना देवाऱ्ह्यात ठेवतो त्यांना पूजतो. जसं आम्ही जय श्री राम म्हणतो तसं आम्ही त्याच किंवा त्याहून मोठ्या आवाजात जय शिवराय म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण देशात सर्वात प्रथम आरमार उभं केलं. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्ही ईव्हीएम मशीनसारखा वापर करू नका. आम्ही आमच्या महाराजांना दैवत मानतो. आपलं दैवत आपण नाही पूजायचं तर दुसरं कुणी पुजायचं? असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;