पालकमंत्री अब्दुल सत्तारांची करामत… अतिवृष्टीचा आढावा घेतला रात्री

पालकमंत्री अब्दुल सत्तारांची करामत… अतिवृष्टीचा आढावा घेतला रात्री

पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या चक्रम कारभाराची चुणूक दोन दिवसांपूर्वीच रुजू झालेल्या जिल्हाधिकार्‍यांना आली. अतिवृष्टीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत सायंकाळी पाच वाजता बैठक ठेवण्यात आली. मात्र सत्तार तब्बल साडेचार तास उशिराने बैठकीला पोहोचले. तोपर्यंत सत्तारांची र्वींट बघून बरेचसे अधिकारी, कर्मचारी घरी निघून गेले. समोर मोजकेच कर्मचारी असल्याचे पाहून सत्तारांची टोपी फिरली आणि त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना बैठकीला गैरहजर असलेल्यांना नोटीसा बजावण्याचे फर्मान सोडले. सत्तारांच्या या अजब कारभारामुळे प्रशासनामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

गेल्या चार दिवसांपासून हिंगोली जिल्ह्याला तुफान पावसाने झोडपून काढले आहे. अतिवृष्टीने जिल्ह्यातील तब्बल सव्वादोन लाख हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली आहे. कयाधू नदी कोपल्याने शहरातील वस्त्यांमध्ये पाणी घुसले. वसमत, कळमनुरी, सेनगाव, औंढा नागनाथ तालुक्यांनाही अतिवृष्टीचा जबर फटका बसला. जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टीच्या तडाख्याने उद्ध्वस्त झालेला असताना पालकमंत्री अब्दुल सत्तार हे गायब होते. सोमवारी अचानक ते उगवले. सोडेगाव, डोंगरपूल आणि सावरखेडा येथे रस्त्यावरूनच त्यांनी नुकसानीची पाहणी केली.

बैठकीला येताच पारा चढला…

अतिवृष्टीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत सायंकाळी पाच वाजता बैठकीचे आयोजन केले होते. त्यानुसार सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी बैठकीसाठी उपस्थित होते. मात्र रात्रीचे नऊ वाजून गेले तरी सत्तारांचा पत्ता नसल्याने हळूहळू अधिकारी, कर्मचार्‍यांनी घर जवळ केले. साडेनऊ वाजता सत्तारांचे आगमन झाले. बैठकीला तुरळक उपस्थिती पाहून सत्तार नवे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्यावरच उखडले. बैठकीला गैरहजर असणार्‍यांना नोटिसा बजावा, असा फतवाच सत्तारांनी काढला. ‘एकतर सत्तार स्वत:च साडेचार तास उशीरा आले आणि नोटिसा आम्हाला’, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रशासकीय कर्मचार्‍यांमध्ये उमटली आहे.

नोटिसा काढणार

सोमवारी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पूर परिस्थिती आणि पीक नुकसानीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला काही अधिकारी आणि कर्मचारी गैरहजर होते. पालकमंत्र्यांच्या सुचनेनुसार अशा कर्मचार्‍यांना नोटीस बजावण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;