कामात शंभर टक्के भ्रष्टाचार झाला असणार! जगविख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांचे परखड मत

कामात शंभर टक्के भ्रष्टाचार झाला असणार! जगविख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांचे परखड मत

‘‘मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे ही घटना मनाला अत्यंत वेदना देणारी आहे. या घटनेला भ्रष्टाचार, कमिशनखोरी आणि राजकीय सिस्टम जबाबदार आहे. शंभर टक्के यात भ्रष्टाचार झाला असणार,’’ असे परखड मत जगविख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांनी व्यक्त केले. अनुभव नसणारे कारागीर आणि टेंडरबाजी प्रक्रियाही याला कारणीभूत असल्याचेही ते म्हणाले.

सिंधुदुर्गात मालवणच्या समुद्रकिनारी राजकोट किल्ल्यावर उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याने महाराष्ट्रात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेसंदर्भात दैनिक ‘सामना’शी बोलताना जगविख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांनी आपले परखड मत मांडले. रामपुरे हे देशातील उत्कृष्ट शिल्पकार म्हणून ओळखले जातात. देशातील सर्वांत मोठा 108 फुटांचा शंकराचार्यांचा पुतळा त्यांनी उभारला आहे.

वाऱ्याच्या वेगाचा विचार आधीच का केला नाही?

‘‘ताशी 45 कि.मी. वेगाने वारे वाहत असल्यामुळे  पुतळा कोसळला, असा युक्तिवाद आता केला जात आहे. परंतु याचा विचार पूर्वीच का केला गेला नाही?’’ असा खडा सवाल रामपुरे यांनी केला. ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेमुळे संपूर्ण देशवासीयांची मने दुखावली आहेत. एक कलावंत म्हणून माझ्यासाठी अत्यंत वेदना देणारी व शरमेची ही घटना आहे,’’ अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

वरिष्ठ नेत्यांना खूश करण्यासाठी

‘‘अलीकडे एक राजकीय ट्रेंड निघाला आहे. आपल्या वरिष्ठ नेत्यांना खूश करण्यासाठी, निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून आधी उद्घाटनाची तारीख ठरविणे आणि पुतळ्याच्या कामाला सुरुवात करणे, घाईत काम उरकायला लावणे, कमिशनखोरीसारख्या प्रवृत्ती या घटनेस जबाबदार आहेत,’’ असे त्यांनी सांगितले.

मित्राच्या मुलाला अनुभव नसताना काम दिले

‘‘छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी वास्तविक अनुभवी शिल्पकारांची निवड करणे गरजेचे होते; परंतु कोणाच्या तरी मित्राचा मुलगा असेल म्हणून अनुभव नसणाऱ्या एका 24 वर्षीय मुलाला हे काम देण्यात आले. टेंडरबाजी प्रक्रिया, कमी किमतीत काम करून घेण्याबरोबरच या घटनेला राजकीय सिस्टम जबाबदार आहे,’’ असे रामपुरे यांनी स्पष्टपणे सांगितले. ‘‘पुतळ्याचे काम सुरू असताना केंद्र सरकारची भूमिका काय होती? कला संचालनालयाने या कामासाठी परवानगी दिली होती का?’’ असे प्रश्न उपस्थित करून रामपुरे यांनी या घटनेला केंद्र व राज्य सरकार जबाबदार असल्याचे अप्रत्यक्षपणे सूचित केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;