बहिणींवर अत्याचार होत असताना कंसमामा निर्लज्जासारखा राख्या बांधून फिरतोय! भर पावसात उद्धव ठाकरे मिंध्यांवर गरजले
बदलापूरमध्ये झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ शिवसेना भवन येथे भर पावसात महिला आणि शिवसैनिकांनी जोरदार घोषणा देत आपला आक्रोष व्यक्त केला. नराधमाला फाशी द्या, फाशी द्या… मिंधे सरकार हाय हाय… कंस मामा हाय हाय…राजीनामा द्या… राजीनामा द्या… कंसमामा राजीनामा द्या…मिंधे सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय…निषेध असो, निषेध असो… मिंधे सरकारचा निषेध असो…अशा घोषणांनी शिवसेना भवन आणि दादर परिसर दणाणून सोडला. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बहिणींवर अत्याचार होत असताना राख्या बांधून निर्लज्जासारखं फिरणाऱ्या कंसमामावर आसूड ओढला.
शिवसेना भवन परिसरात जमलेल्या नागरिकांना संबोधित करताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘आजही महाराष्ट्रात जिवंत मनं आहेत याचे दर्शन घडले. महाराष्ट्रावर मुर्दाड सरकार राज्य करतंय. या सरकारची मला कीव येते. सरकार नराधमांवर पांघरून घालण्याचे काम करतंय. त्यांना पाठीशी घालण्याचे काम करतंय. बदलापूरमधील दृष्कृत्य झाल्यानंतर सरकारने खणखणीत भूमिका घ्यायला पाहिजे होती. ज्यावेळी सर्व दारं बंद होतात तेव्हा जनतेला रस्त्यावर उतरण्याखेरीच पर्याय नसतो.’
‘आजचा बंद कडकडीत झाला असता. याची जाणीव सरकारला झाली. त्यांच्यात संकटांचा सामना करण्याची हिंमत नाही. संकटांचा बंदोबस्त करण्याची ताकद नाही. असे हे निर्ढावलेले सरकार आपल्या महाराष्ट्रावर राज्य करत आहे. महाराष्ट्र बंद कडकडीत होईल याचा अंदाज आल्याने सरकारने त्यांचे चेलेचपाटे कोर्टात पाठवले आणि महाराष्ट्र बंदमध्ये अडथळा निर्माण केला’, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List