महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवरून शरद पवार यांचा थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा; वाचा काय म्हणाले…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात ‘वन नेशन, वन इलेक्शन’चा उल्लेख केला होता. त्यानंतर दोनच दिवसात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत जम्मू-कश्मीर आणि हरियाणा या राज्यांची विधानसभा निवडणूक जाहीर केली. यावेळी महाराष्ट्रासह झारखंडच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर होईल अशी शक्यता होती. मात्र निवडणूक आयोगाने वेगवेगळी कारणं देत येथील निवडणूक टाळली. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.
लाल किल्ल्यावरून भाषण देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबंध देशाच्या निवडणुका एकाचवेळी व्हाव्यात अशा प्रकारची भूमिका मांडली. ही भूमिका मांडून काही तास होत नाही तोच आपल्याला जम्मू-कश्मीर आणि हरियाणाची निवडणूक जाहीर झाल्याचे ऐकायला मिळाले. मात्र यावेळी झारखंड आमि महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर झाली नाही. वन नेशन, वन इलेक्शनचे धोरण मोदी मांडत असताना महाराष्ट्राच्या निवडणुकीसंदर्भातील त्यांचा हा निर्णय एक प्रकारचा विरोधाभास आहे, असा टोला शरद पवार यांनी लगावला. ते नागपूर येथे पत्रकारांशी बोलत होते.
दरम्यान, बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदला नाशिकमध्ये हिंसक वळण लागले. यावरही पवारांनी भाष्य केले. जे काही घडले ते राज्याच्या आणि समाजाच्या हिताचे नाही. आत शांततेची गरज असून ती प्रस्थापित करायची असेल तर समाजकारण, राजकारण या क्षेत्रातील लोकांनी याची खबरदारी घ्यायला हवी. तसेच अन्य देशात घडलेल्या गोष्टीवरून आपल्या देशातील सर्वसामान्य लोकांचे जनजीवन विस्कळीत होईल असे वागू नये, असे आवाहन शरद पवार यांनी केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List