मिंधे सरकारच्या दबावतंत्रामुळे यवतमाळ महिला बँकेप्रकरणी आरोपींवर गुन्हे दाखल होण्याची प्रक्रिया रखडली?
>> प्रसाद नायगावकर
परिवाराशी निगडित असलेली महिला अर्बन बँक दिवाळखोरीत निघाल्यानंतर 9 नोव्हेंबर 2022 च्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आदेशाने सदर बँकेचा परवाना रद्द करण्यात आला होता. या बँकेत सुमारे अडीच अब्ज रुपयाचा घोटाळा झाल्याचे समोर येत आहे. नडल्या गेलेल्या सामान्य सभासदांचे लक्ष गैरव्यवहारातील दोषींवर होणाऱ्या कारवाईकडे लागले होते. या प्रकरणी आरोपींवर गुन्हे दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला होता पण आता ही प्रक्रिया पुन्हा रखडली आहे . मिंधे सरकारच्या दबावतंत्रामुळे ही प्रक्रिया रखडली का असा प्रश्न आता ठेवीदार विचारात आहे.
यवतमाळ महिला बँकेप्रकरणी मात्र दोन वर्षात कुठलीही कारवाई होत नसल्याने प्रकरण दडपले जाते की काय अशी शंका सभासदांमधून व्यक्त होत होती. मात्र विशेष लेखापरिक्षकांच्या चौकशी अहवालानंतर सदर प्रकरण हे स्थानिक गुन्हे शाखेकडे वळते करण्याचे निर्देश सहकार आयुक्तांकडून देण्यात आले. पण शासनाच्या नव्या परिपत्रकानुसार ( जी आर ) दोषारोप पत्र दाखल करण्याच्या परवानगीसाठी हे प्रकरण आता अप्पर पोलीस महासंचालक आर्थिक गुन्हे शाखा मुंबई यांच्याकडे वळते केले गेले होते. पण अप्पर पोलीस महासंचालक आर्थिक गुन्हे शाखा मुंबई यांनी आरोपींवर गुन्हे नोंद करण्यास हिरवा कंदील दाखविल्याने यवतमाळ महिला बँकेप्रकरणी गुन्हे नोंद होण्याची प्रक्रियेचा मार्ग आता मोकळा झाला होता.
गुरुवारी तारखेला यासंबंधी अवधूतवाडी पोलीस स्थानकात संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल होणार होते . ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी अमरावतीवरून सुनीता पांडे ( लेखा परीक्षण वर्ग 1 , साखर ) या आपल्या सहकाऱ्यांसोबत यवतमाळ येथे पोहचल्या होत्या . पण काल गुरुवारी आणि आज शुक्रवारी या संदर्भात कोणतीही गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया पार पडली नाही . काही तांत्रिक अडचणींमुळे FIR नोंदविल्या गेला नसल्याचे सांगितले गेले. पण नेमकी तांत्रिक अडचण कोणती होती याचे स्पष्टीकरण अद्याप समोर आले नाही .
विशेष लेखापरिक्षकांच्या चौकशी अहवालानंतर आणि अप्पर पोलीस महासंचालक आर्थिक गुन्हे शाखा मुंबई यांनी आरोपींवर गुन्हे नोंद करण्यास हिरवा कंदील दिल्यानंतर फक्त आरोपींवर गुन्हे नोंदवायचे शिल्लक होते. पण माशी नेमकी कुठे शिंकली अन ही प्रक्रिया रखडली . आत नेमका कोणत्या दिवशी गुन्हे नोंद करणार की तारीख पे तारीख असाच सुरू राहणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल .
संघ परिवाराशी निगडित असलेली बाबाजी दाते महिला अर्बन बँक घोटाळ्या प्रकरणी बरीच बडी मंडळी अडकली आहे आणि यांच्यावर तपासाचा फास अधिक पक्का होणार होता हे नक्की आहे अशी चर्चा सर्वत्र सुरु होती . पण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीकडे बघता या विषयांचे गंभीर परिणाम बघावयास मिळण्याच्या शक्यतेने या तांत्रिक बाबी समोर केल्या जात तर नाही ना अशी शंका घेण्यास वाव मिळत आहे .
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List