सांगलीत जुन्या पेन्शनसाठी सांगलीत प्रचंड ‘आक्रोश मोर्चा’
जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू केलीच पाहिजे, अशी मागणी करीत सांगलीत ‘महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना’ पुरस्कृत विविध शासकीय कर्मचारी आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ‘आक्रोश मोर्चा’ काढला.
यावेळी नवीन पेन्शन योजना माथी मारून शासनाने राज्यातील शासकीय शाळा व महाविद्यालयांच्या कर्मचाऱ्याची जगण्याची गँरटीच काढून घेतली आहे. जुनी पेन्शन योजना ही शासकीय कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्याना सुरक्षित जगण्याचा आधार आहे. पेन्शनची नवीन योजना फसवी आहे. ‘जो पुरानी पेन्शन बहाल करेगा, वो ही महाराष्ट्र पर राज करेगा’ अशी घणाघाती तोफ पृथ्वीराज पाटील यांनी शासनावर डागली.
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विश्रामबाग चौकातून ढोल-ताशांच्या गजरात ‘आक्रोश मोर्चा’स प्रारंभ झाला. ‘एकच मिशन… जुनी पेन्शन’ अशा मजकुराच्या टोप्या परिधान करून हजारोंच्या संख्येने भरपावसात शासकीय आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. महिला कर्मचाऱ्याच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. अमोल शिंदे यांनी प्रास्ताविक केले.
पृथ्वीराज पाटील म्हणाले, ‘हा निर्धार मोर्चा आहे. महाआघाडीच्या वरिष्ठ नेत्यांकडे मी आपला प्रतिनिधी म्हणून जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी आवश्यक ती तजवीज करण्याचा आग्रह धरणार आहे. जुन्या पेन्शन योजनेस काँग्रेसचा पाठिंबा आहे. शासनाने जुनी पेन्शन योजना लागू होऊ नये यासाठी कर्मचाऱ्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. तो हाणून पाडण्यासाठी सर्व 45 कर्मचारी संघटनांची एकीची मूठ अधिक घट्ट करा. 14 मार्च 2023 रोजी आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत व आमदार अरुण लाड यांच्या नेतृत्वाखाली सांगली व कोल्हापुरातील मोर्चाची दखल घेत शासनाने जुन्या पेन्शनबाबत समिती नेमली. मात्र, पुढे काहीच झाले नाही. केंद्र व राज्य शासनाने आणलेली नवी पेन्शन योजना ही कर्मचाऱ्याचा पैसा शेअर बाजारात गुंतवून उद्योगपतींचे खिसे भरून कर्मचाऱ्याचे आयुष्य उद्ध्वस्त करणारी आहे,’ असे त्यांनी सांगितले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय विभुते म्हणाले, ‘आपण सर्वसामान्य शेतकऱ्याची मुले आहोत. आपल्याला फसव्या ‘लाडक्या’ योजना नकोत. शेतमालाला हमीभाव द्या. सन्मानाने जगण्यासाठी जुनी पेन्शन योजना लागू करा,’ अशी मागणी त्यांनी केली. जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांचेही भाषण झाले.
या आक्रोश मोर्चात खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघटना, कास्ट्राइब, जिल्हा परिषद व महसूल खात्याच्या अधिकारी व कर्मचारी संघटना, शिक्षक भारती, शिक्षक परिषद, आरोग्य कर्मचारी संघटना, डीसीपीएस संघटना, सेवानिवृत्त कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी व कर्मचारी हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List