नगर जिल्ह्यात नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नद्यांच्या पाणी पातळीत वाढ

नगर जिल्ह्यात नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नद्यांच्या पाणी पातळीत वाढ

नगर जिल्ह्यात आजपर्यंत 343.5 मिलीमीटर पाऊस झाला आहे. शेजारील पुणे व नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुणे व नाशिक जिल्ह्यातून नगर मध्ये येणाऱ्या नद्यांच्या व धरणाच्या पाण्यात वाढ होत आहे. नगर जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी, भीमा, प्रवरा, कुकडी व गोड नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे या नदीकाठवरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे‌, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी केले आहे.

नगर जिल्ह्यातील सरासरी पर्जन्याच्या 76.66% (जून ते सप्टेंबर सरासरी पर्जन्याच्या) पर्जन्यमान झाले आहे. रविवारी दुपारी 12.00 वाजता जिल्ह्यातील गोदावरी नदीत नांदूर मध्यमेश्वर धरणातून 44 हजार 768 क्यूसेक, भिमा नदीत दौंड पूल येथून 74 हजार 456 क्यूसेक, प्रवरा नदीत भंडारदरा धरणातून 27 हजार 114, निळवंडे धरणातून 21 हजार 855, ओझर बंधारा येथून 1 हजार 392 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे ‌‌. कुकडी नदीत येडगाव धरणातून 7 हजार 500 क्यूसेक, घोड नदीत घोड धरणात 10 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे‌.

पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला असून खडकवासला व इतर धरणातून विसर्ग सुरू आहे. पुणे जिल्हयात पर्जन्यमान सुरु असून दौंड पुल येथे भिमा नदीच्या विसर्गामध्ये वाढ होत आहे. तरी नगर जिल्हयातील श्रीगोंदा व कर्जत तालुक्यातील भिमा नदीकाठावरील नागरिकांना अति सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या पावसामुळे गोदावरी नदीतील विसर्गामध्ये वाढ होऊ शकते. तर नगर जिल्ह्यातील कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर व नेवासा या तालुक्यातील गोदावरी नदीकाठावरील नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झालेली असून प्रवरा नदीच्या विसर्गामध्ये वाढ झालेली आहे. तसेच निळवंडे धरणातून प्रवरा नदीपात्रात विसर्ग सुरु असून संततधार पाऊस वा अतिवृष्टी झाल्यास विसर्गात वाढ होऊ शकते. पर्यायाने ओझर बंधा-यावरुन प्रवरा नदीच्या विसर्गामध्ये वाढ होऊ शकते. तरी नगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहाता, राहुरी, श्रीरामपूर व नेवासा तालुक्यातील प्रवरा नदी काठावरील नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. पुणे जिल्हयात सुरु असलेल्या पर्जन्यामुळे येडगाव धरणातून कुकडी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तरी अहमदनगर जिल्हयातील पारनेर तालुक्यातील कुकडी नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. पुणे जिल्हयातील धरणाद्वारे सोडलेल्या विसर्गामुळे घोड धरणाची पाणी पातळी वाढत असून घोड धरणातून घोड नदीत पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तरी नगर जिल्हयातील श्रीगोंदा तालुक्यातील घोड नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

नागरिकांनी स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सूचनांचे पालन करावे. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रापासून तसेच ओढे व नाले यापासून दूर रहावे व सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. नदी अथवा ओढे नाल्यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास पुल ओलांडू नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करु नये. जुनाट/मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये. अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांनी दक्षता घ्यावी व वेळीच सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे. घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे. धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणा-या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरु नये. अचानक नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यास जिवीतास धोका उदभवू शकतो. धोकादायक ठिकाणी चढू अथवा उतरु नये, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. मेघगर्जना होत असताना झाडांच्या खाली न थांबता सुरक्षीत ठिकाणी आश्रय घ्यावा. आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील दुरध्वनी क्र. 1077 (टोल फ्री), 0241-2323844 वा 2356940 वर संपर्क पक साधावा.असे आवाहन ही पाटील यांनी केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;