मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी पोलीस भरती थांबवली!
मुख्यमंत्र्यांची मिंधेगिरी करणाऱ्या पोलीस आयुक्तांनी आज बेरोजगारांची परवड केली. पोलीस आयुक्तांनी ऐनवेळी फर्मान काढून कारागृह पोलीस भरतीच रद्द केली. ऐनवेळी भरती रद्द झाल्याने बेरोजगारांचे प्रचंड हाल झाले. दरम्यान, या बेरोजगारांची विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भेट घेऊन त्यांना दिलासा दिला.
मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमासाठी परिवहन मंडळाच्या तब्बल 500 पेक्षा जास्त बसेस महिलांना आणण्यासाठी जुंपण्यात आल्या. जिल्हय़ातील निम्म्यापेक्षा जास्त पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी पाठवण्यात आले. मुख्यमंत्र्यांचा दौरा आठवडाभर अगोदरच ठरलेला होता. त्यानुसार नियोजन करताना कारागृह पोलीस भरतीही लक्षात घ्यायला हवी होती, परंतु पोलीस प्रशासनाने मुख्यमंत्र्यांची मिंधेगिरी करण्यासाठी भरतीसाठी आलेल्या बेरोजगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता आज भरती रद्द झाल्याचे जाहीर केले. भरतीची तारीखही निश्चित होती. किमान तीन दिवस अगोदर भरती पुढे ढकलणार याची माहिती देणे अपेक्षित होते. परंतु तसे झाले नाही.
मुख्यमंत्र्यांच्या ‘लाडकी बहीण’ कार्यक्रमासाठी ऐनवेळी पोलीस भरती रद्द करण्यात आली. बेरोजगारांची पोलीस आयुक्तांनी हेळसांड केली. पुन्हा भरती कधी होणार याची माहिती देण्याचे सौजन्यही दाखवण्यात आले नाही. बेरोजगारांची व्यवस्था केल्याचे सांगतात, पण ही व्यवस्था दिसली नाही.
– अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List