मिंधे सरकारचे ‘राम नाम सत्य है’; खालापूरच्या आरकसवाडीत दुथडी भरून वाहणाऱ्या नदीतून अंत्ययात्रा

मिंधे सरकारचे ‘राम नाम सत्य है’; खालापूरच्या आरकसवाडीत दुथडी भरून वाहणाऱ्या नदीतून अंत्ययात्रा

एकीकडे सरकार तुमच्या दारी, अशा घोषणा करत असताना मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या खालापूरकरांचे दुर्दशेचे फेरे संपलेले नाहीत. आदिवासींना मृत्यूनंतरही यातना सहन कराव्या लागत आहेत. पूल नसल्याने आरकस या आदिवासी वाडीतील मृत व्यक्तीची दुथडी भरून वाहणाऱ्या नदीतून अंत्ययात्रा काढावी लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भाजपच्या आमदाराने सहा महिन्यांपूर्वी पुलाच्या कामाचे भूमिपूजन केले. मात्र अद्यापही हा पूल कागदावरच आहे. त्यामुळे मिंधे सरकारच्या नावाने ‘राम नाम सत्य है’ असे म्हणण्याची वेळ आरकस वाडीमधील ग्रामस्थांवर आली आहे.

खालापूरच्या आरकस या आदिवासी वाडीतील नागरिकांना अंत्यविधीसाठी नदी पार करून पीरकट वाडीतील स्मशानभूमी गाठावी लागते. आठवडाभर कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला आहे. नदीवर पूल नसल्याने ग्रामस्थ कमरेपर्यंत पाण्यातून अंत्यविधीसाठी स्मशानभूमीपर्यंत जातात. आरकस वाडी येथे राहणारे कमल चौधरी यांचे निधन झाले. त्यांचा मृतदेह स्मशानभूमीत नेण्यासाठी नातेवाईकांना जीव धोक्यात घालत नदीतून मार्ग काढून स्मशानभूमी गाठावी लागली. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. सहा महिन्यांपूर्वी मोठा गाजावाजा करत भाजप आमदार महेश बालदी यांच्या हस्ते पुलाचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र अद्याप या कामाची एकही वीट रचली गेली नाही. त्यामुळे सरकारच्या बेभरोसे कारभाराविरोधात संताप व्यक्त होत आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष
आरकसवाडीत एखाद्याचे निधन झाले तर नदीच्या पलीकडे असलेल्या पीरकत वाडीत अंत्यसंस्कारासाठी जावे लागते. स्मशानभूमीपर्यंत पोहोचण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नसल्यामुळे ग्रामस्थांना नाइलाजाने दुथडी भरून वाहणाऱ्या नदीतून प्रेतयात्रा काढावी लागते. देशाला स्वातंत्र मिळून ७५ वर्षे उलटली तरी आरकसवाडीत स्मशानभूमी नसल्याने विकास गेला कुठे, असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. उंबरणेवाडी, पीरकटवाडी आणि आरकसवाडीतील ग्रामस्थांनी नदीवर पूल बांधावा यासाठी अनेकदा आवाज उठवूनही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.

विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास
विद्यार्थ्यांना शाळा गाठण्यासाठी नदीतून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात नदीत पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने विद्यार्थ्यांना बऱ्याचदा शाळेला दांडी मारावी लागते. नदीवर पूल नसल्याने रुग्ण, गर्भवती महिला, सर्पदंश झालेल्या रुग्णांना वेळीच उपचार मिळत नसल्याने अनेकदा त्यांना जीव गमवावा लागतो.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;