स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांचा जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हल्ला, दोन जणांवर गुन्हा दाखल
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर आज भररस्त्यात स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. संभाजीराजेंच्या शरीरात छत्रपती शाहू महाराजांचे रक्त आहे का हे तपासावे लागेल, असे वक्तव्य विशाळगड हिंसाचाराच्या घटनेबद्दल बोलताना आव्हाड यांनी केले होते. त्याचा राग डोक्यात धरून स्वराज्य संघटनेकडून आव्हाड यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला. स्वराज्य संघटनेने या हल्ल्याची जबाबदारीही स्वीकारली. याप्रकरणी पुणे गुन्हे शाखेने स्वराज्य संघटनेचे डॉ धनंजय जाधव यांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी करून मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे.
जितेंद्र आव्हाड हे आज दुपारी 4 वाजता त्यांच्या रँगलर जीपने मुंबईहून ठाण्याला जात असताना डोंगरी परिसरातील वाडीबंदर जंक्शन येथे सिग्नलला गाडी थांबली. त्यावेळी आधीच मागावर असलेल्या स्वराज्य संघटनेच्या तीन कार्यकर्त्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देत दांडक्यांनी आव्हाड यांच्या गाडीच्या काचा पह्डल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नितीन देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीवरून डोंगरी पोलिसांनी याप्रकरणी अंकुश कदम व धनंजय जाधव या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेनंतर आव्हाड म्हणाले की, ‘‘तीन जणांनी आज माझ्या गाडीवर हल्ला केला. मी अशा भ्याड हल्ल्यांना घाबरणार नाही. मी विशाळगडाबाबत बोललो कारण छत्रपती शाहू महाराजांनी समतेचा जो वारसा दिला आहे, तो संभाजीराजेंनी पुढे न्यायला पाहिजे होता, पण त्यांनी केवळ बोलघेवडेपणा केला.’’
शांत बसणार नाही… विचारांची लढाई लढत राहणार
“संभाजीराजेंनी दुसऱया टोळक्याला विशाळगडावर जाण्याची संधी दिली आणि त्यामुळे तोडपह्ड झाली. संभाजीराजे क्रमांक एकचे आरोपी आहेत. तरीही मी त्यांना अटक करण्याची मागणी केली नाही. आज जो हल्ला झाला, त्यावरही मी पोलीस तक्रार करणार नाही. माझ्या गाडीवर हल्ला करून मी शांत बसेन असे तुम्हाला वाटत असेल, पण तसे होणार नाही. मी आणखी त्वेषाने तुमच्याविरोधात बोलणार आहे. माझी विचारांची लढाई आहे, ती मी लढत राहणार,’’ असे जितेंद्र आव्हाड प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. आतापर्यंत संभाजीराजेंना आदरार्थी बोलत होतो, पण आता मी बोलण्यासाठी मोकळा आहे, असा इशाराही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी दिला.
ठाण्यात रास्ता रोको
जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर त्याचे पडसाद ठाण्यात उमटले. राष्ट्रवादीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी ठाण्यातील पूर्व द्रुतगती महामार्गासह मुंब्य्रातील अमृतनगर येथे रास्ता रोको केला. यावेळी आव्हाड समर्थकांनी आक्रमक होत राज्य सरकार आणि भारतीय जनता पक्षाविरोधात घोषणाबाजी केली. या हल्ल्यानंतर ठाण्यातील आव्हाड यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List