राजेश शहाचे गुरू साटमशी कनेक्शन? एन्काऊंटरच्या भीतीने पालघरला पलायन
वरळी येथील ‘हिट अॅण्ड रन’ केस प्रकरणातील आरोपी राजेश शहा याचे गुरू साटम टोळीशी संबंध असल्याचे अंडरवर्ल्डमध्ये बोलले जात असताना मुंबई क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी राजेश शहा याच्या बोरिवली (प.) येथील घरासमोरच राजू दुर्गाप्रसाद सोनी ऊर्फ राजू लक्का या गुरू साटमच्या साथीदारास चकमकीत ठार मारून राजेश शहाला हादरा दिला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.
शिवसेनेचे परळ येथील आमदार विठ्ठल चव्हाण यांच्या हत्येनंतर गुरू साटमची मुंबईत दहशत निर्माण झाली होती. परळ, लालबागप्रमाणे गुरू साटमने बोरिवली येथेही आपला जम बसविला होता. आपल्या हस्तकांमार्फत गुरूने बोरिवलीमध्ये खंडणी वसुली सुरू केली होती. राजेश शहा हा व्यापारी, बिल्डर यांच्याकडून दरमहा गुरू साटम टोळीला खंडणी वसुली करून द्यायचा, अशी माहिती सूत्रांनी दिली.
गुरू साटमचा हस्तक राजू सोनी जेव्हा राजेश शहाच्या घराजवळ आला तेव्हा झालेल्या चकमकीत (1 ऑगस्ट 2002) राजू सोनी ठार झाला. याचा धसका राजू शहाने घेतला व त्याने बोरिवली सोडून पालघर गाठले. तेथे त्याने राजकीय पुढाऱ्यांशी संधान साधून आपला बचाव केला. राजेश शहा हा बांधकाम व्यवसायात घुसला व गब्बर झाला, अशी माहिती देताना एक अधिकारी म्हणाला, दोन-अडीच दशकांपूर्वी बोरिवली पोलीस ठाण्यात राजेश शहावर खंडणीचे गुन्हे दाखल होते. बोरिवलीतून त्याने पालघरला पलायन केले. तेथे त्याने बरीच मालमत्ता राजकीय नेत्यांच्या मदतीने उभी केली. त्याचे तिथे फार्महाऊस आहे, अशीही माहिती सूत्रांनी दिली.
राजेश शहाला ‘पालघर आरपी’ या टोपण नावाने ओळखले जाते. अशा या गुन्हेगारांशी जवळीक असलेल्या राजेश शहाने वरळी येथे कावेरी नाखवा या महिलेला अपघातात अत्यंत क्रूररीत्या ठार मारणाऱ्या आपल्या मुलाला पळून जाण्याचा सल्ला दिला. वरळी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 105, 281, 125 (ब), 238, 324 (4) यासह 184, 134 (अ), 134 (ब), 187 या वाहन कायद्याअन्वये त्याचा मुलगा मिहीर व राजेश शहाविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. राजेश शहा हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने व त्याला राजकीय पुढाऱ्यांचा व सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा असल्याने राजेश शहा याने आपल्या मुलाला पळून जाण्यास मदत केली; परंतु विरोधकांनी उठाव केल्याने मिहीर शहा व राजेश शहा या पितापुत्रांना सत्ताधाऱ्यांना वाचविणे कठीण गेले असे बोलले जात आहे.
नाखवा कुटुंबाला सरकारकडून 10 लाखांची मदत
नाखवा कुटुंबाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 10 लाखांची आर्थिक मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. पीडित कुटुंबाला जी काही मदत लागेल, मग ती कायदेशीर असो किंवा आर्थिक असो, त्यांना दिली जाईल, असे ते म्हणाले. पुण्यामधील हिट अॅण्ड रन प्रकरणानंतर पब आणि बारवर कारवाईचे आदेश देण्यात आले होते. वरळीच्या प्रकरणानंतरही तशा कारवाया करण्यात येत आहेत, असे त्यांनी सांगितले.
दोन-अडीच दशकांपूर्वी बोरिवली पोलीस ठाण्यात राजेश शहावर खंडणीचे गुन्हे दाखल होते. बोरिवलीतून त्याने पालघरला पलायन केले. तेथे त्याने बरीच मालमत्ता राजकीय नेत्यांच्या मदतीने उभी केली. त्याचे तिथे फार्महाऊस आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List