दुसऱ्या लग्नानंतरही अरमानला का स्वीकारलं? पायलकडून मोठा खुलासा
युट्यूब कंटेंट क्रिएटर पायल मलिक ही ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या सिझनमध्ये पती अरमान मलिक आणि सवत कृतिका मलिकसोबत स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. मात्र बिग बॉसमधील पायलचा प्रवास लगेच संपला. घरातून बाहेर पडल्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल बरेच खुलासे केले आहेत. पायल ही अरमानची पहिली पत्नी आहे. अरमानने पायलचीच खास मैत्रीण कृतिकाशी दुसरं लग्न केलंय. अरमानकडून झालेली फसवणूक, कुटुंबीयांशी तोडलेले सर्व संबंध यांविषयी पायल या मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाली.
अरमान, पायल आणि कृतिका यांनी याआधी अनेकदा बहुपत्नीत्व संबंधाचं समर्थन केलंय. ही एखाद्याची वैयक्तिक निवड असू शकते, असं म्हणत त्यांनी त्यांची बाजू मांडली होती. मात्र अरमान माझ्याशी चुकीचं वागला, अशी कबुली पायलने या मुलाखतीत दिली. “होय, अरमानने माझ्यासोबत चुकीचं केलं. मी माझं घर त्याच्यासाठी सोडलं होतं. जवळपास 8 वर्षांपासून मी त्याच्यावर अवलंबून होते. माझ्यासाठी तोच सर्वस्व होता आणि अचानक एकेदिवशी त्याच्या आयुष्यात दुसरी व्यक्ती आली. त्यामुळे होय, माझ्यासोबत अन्याय झालाय. पण जसं मी याआधीही म्हटलं होतं की आज आणि भविष्यातही तो मलाच प्राधान्य देईल. माझ्यानंतर कृतिका येते आणि हे तिलासुद्धा माहीत आहे. हे आमच्या कुटुंबीयांना आणि सबस्क्राइबर्सनाही माहीत आहे”, असं पायल म्हणाली.
अरमानने दुसऱ्या लग्नासाठी त्याचा धर्म बदलला का, याविषयी प्रश्न विचारला असता पायलने उत्तर दिलं, “हे खरं नाही. त्याने इस्लाम धर्म स्वीकारला नाही. तो जट कुटुंबाचा आहे. तो मुस्लीम नाही. माझ्याशी लग्न करण्यापूर्वी त्याचं पहिलं लग्न झालं होतं. तिला त्याने घटस्फोट दिला होता.” अरमानने फसवणूक केल्याची भावना मनात असतानाही त्याच्या आणि सवतसोबत एकाच घरात राहण्याचा निर्णय पायलने का घेतला, असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याचंही उत्तर पायलने या मुलाखतीत दिलं आहे.
ती पुढे म्हणाली, “त्याने दुसरं लग्न करूनही मी त्याच्यासोबतच राहण्याचा निर्णय यासाठी घेतला कारण माझं त्याच्यावर प्रेम आहे. त्याचप्रमाणे मी मुलगा चिकूसाठी हे लग्न टिकवतेय. मला असं राहायला आवडतंय, यात कोणीच माझ्यावर बळजबरी केली नाही. कोणतीच महिला तिच्या पतीचं दुसरं लग्न सहन करणार नाही. पैसा दुय्यम आहे, पण जर तुम्ही या नात्यात खुश नसाल तर कोणीच तुम्हाला त्यात बांधून ठेवू शकत नाही. मी या नात्यात खुश आहे. यात चांगली गोष्ट म्हणजे कृतिकासारखी मुलगी माझ्या आयुष्यात आली. ती माझ्याबद्दल सर्वांत आधी विचार करते. ती अरमानपेक्षाही जास्त प्रेम माझ्यावर करते. माझा शब्द हा तिच्यासाठी शेवटचा असतो. ती माझ्याशी भांडत नाही. या घरात मीच बॉस आहे.”
अरमानशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे पायलच्या कुटुंबीयांनी तिच्याशी सर्व संबंध तोडले आहेत. लग्नानंतर पुन्हा कधी कुटुंबीयांशी संपर्क साधला का, असं विचारलं असता तिने सांगितलं, “जेव्हा मी अरमानला सोडून गेले होते, तेव्हाच मी फोनवर कुटुंबीयांशी बोलले होते. पण जेव्हा मी अरमानकडे परतले, तेव्हा त्यांनी पुन्हा संपर्क तोडला. मी गुज्जर समुदायाची आहे आणि एकत्र कुटुंबात लहानाची मोठी झाले. माझे कुटुंबीय माझ्या लग्नाच्या विरोधात होते. त्यातही अरमानने दुसरं लग्न केल्यानंतर त्यांनी माझ्यासोबत सगळेच संबंध तोडले.”
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List