दूध पावडर आयातीचा मुद्दा तापणार; शेतकरी विरोधी निर्णय तातडीने मागे घ्यावा, अजित नवलेंची मागणी
केंद्र सरकारने दूध उत्पादकांच्या जखमेवर मीठ चोळत 15,000 टन दूध पावडर आयात करण्यासाठी परवानगी दिली आहे. केंद्र सरकारने त्यांचा हा शेतकरी विरोधी निर्णय तातडीने मागे घ्यावा अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष डॉ. अजित नवले यांनी केली आहे.
महाराष्ट्रात आणि देशभरात साडेतीन लाख टन दुधाची पावडर गोदामांमध्ये पडून आहे. अतिरिक्त दूध उत्पादन झाल्याची आवई उठवून दुधाचे भाव 35 रुपयावरून पाडून 25 रुपयापर्यंत खाली आणण्यात आलेले आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही त्यातून भरून निघत नाही यामुळे दूध उत्पादक महाराष्ट्रभर मेटाकुटीला आलेले आहेत. आंदोलन करून आपल्या मागण्यांकडे ते सरकारचे लक्ष वेधू पाहत आहेत. अशा परिस्थितीमध्ये देशात आणि महाराष्ट्रात पडून असलेल्या पावडरला निर्यात अनुदान देऊन ही पावडर देशाबाहेर कशाप्रकारे पाठवता येईल याचा विचार करण्याऐवजी केंद्राचं सरकार आणखीन दुधाची पावडर आयात करणार असेल तर यापेक्षा दुसरे दुर्दैव देशातील शेतकऱ्यांचे कोणतेही असू शकत नाही, असं अजित नवले म्हणाले.
केंद्र सरकारने त्यांचा हा शेतकरी विरोधी निर्णय तातडीने मागे घ्यावा व देशभरात पडून असलेल्या दूध पावडरला निर्यात अनुदान देऊन दूध उत्पादकांना उत्पादन खर्चावर आधारित किफायतशीर भाव दुधाला कसा मिळेल याच्यासाठी पावले टाकावीत अशी मागणी दूध उत्पादक संघर्ष समितीच्या वतीने आम्ही करतो आहोत, असंही ते म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List