महायुती सरकारने महाराष्ट्र कर्जात डुबवला! मुख्यमंत्र्यांकडील एमएमआरडीए तोटय़ात कसे? नाना पटोले यांची टीका
महाभ्रष्ट युती सरकारने विकासाच्या नावावर कर्ज काढून राज्यावर अडीच लाख कोटी रुपयांचा बोजा लादला असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. सरकारने जागतिक बँकेसह इतर बँकांकडूनही कर्ज काढले आहे, असे ते म्हणाले. एमएमआरडीएसारखा विभाग नफ्यात होता तोही आता तोटय़ात असून मुख्यमंत्र्यांकडे असतानाही हा विभाग घाटय़ात कसा? असा सवाल पटोले यांनी उपस्थित केला.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सरकारवर तोफ डागली. महाराष्ट्र व उत्तर प्रदेशची तुलना केली तर उत्तर प्रदेश सरकारही असेच कर्ज काढून रस्ते बांधणीचे प्रकल्प करत आहे. उत्तर प्रदेश व महाराष्ट्राच्या रस्ते प्रकल्पाचे अंदाजपत्रक पाहिले तर महाराष्ट्रातील अंदाजपत्रक 40 टक्क्याने वाढीव आहेत. या रस्त्यांच्या कामाचा दर्जाही निकृष्ट आहे. अटल सेतूलाही भेगा पडल्या आहेत हे सर्वांनी पाहिले आहे. 18 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाला भेगा पडतात यावरून त्याच्या कामाचा दर्जा किती निकृष्ट आहे हे दिसून येते, असे पटोले म्हणाले. कर्नाटकातील पूर्वीचे भाजप सरकार 40 टक्के कमिशनवाले होते तर महाराष्ट्रातील युती सरकार 60 टक्के कमिशनवाले आहे, अशी टीका पटोले यांनी केली.
तेलंगणाप्रमाणे राज्यातील शेतकऱयांनाही कर्जमाफी जाहीर झाली पाहिजे तसेच जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी पटोले यांनी आहे. जबाबदार विरोधी पक्ष म्हणून जनतेच्या जिव्हाळय़ाचे प्रश्न सभागृहात मांडू, सरकारमध्ये हिंमत असेल तर प्रत्येक मुद्दय़ावर चर्चा करावी, बहुमताच्या बळावर पळ काढू नये, असा इशाराही पटोले यांनी दिला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List