मार्च महिन्यापासून ठेकेदारांची देयके थकली, रत्नागिरी जिल्हा कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे आंदोलन
रत्नागिरी जिल्ह्यातील ठेकेदारांना मार्चपासून त्यांची देयके आजपर्यंत मिळाली नाहीत. मार्चअखेरीला ठेकेदारांची देयके मिळतात. यंदा मात्र जून महिना संपत आला तरी अद्यापही ठेकेदारांची देयके मिळाली नाहीत. त्यामुळे ठेकेदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. ठेकेदारांची देयके त्वरीत मिळावीत यासाठी रत्नागिरी जिल्हा कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनने आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन छेडले.
रत्नागिरी जिल्हा कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनने प्रशासनाला एक निवेदन दिले आहे. या निवेदनात रत्नागिरी जिल्ह्याला 96 कोटी रुपयांचा निधी मिळत आहे. म्हणजेच रत्नागिरी तालुक्यासाठी सुमारे 25 टक्के रक्कम मिळत आहे. या रक्कमेतून जीएसटी टॅक्स व अन्य खर्च वगळून जेमतेम 20 टक्के रक्कम हाती मिळते. या 20 टक्के रक्कमेतून देणी कशी पूर्ण करायची हा प्रश्न ठेकेदारांनी मांडला आहे. ठेकेदारांचा येणारा निधी शासन बिनव्याजी वापरते. मात्र आम्हाला बँकांकडून घेतलेल्या रक्कमेवर व्याज द्यावे लागते. त्यामुळे आमचे आर्थिक नुकसान होते. तसेच शासकीय कर उशीराने भरले तर दंड भरावा लागतो. त्याचाही आर्थिक फटका बसतो. देयके वेळेत न मिळाल्यामुळे आम्हाला बाजारातून अधिक दराने साहित्य खरेदी करावे लागते. जर देयके वेळेवर मिळाली तर रोखीने खरेदीचा फायदा आम्ही घेऊ शकतो. तसेच यापुढे कार्यारंभ आदेश देताना त्या कामासाठी किती आर्थिक तरतूद केली आहे याची माहिती आम्हाला द्यावी अशी मागणी ठेकेदारांनी केली आहे. यावेळी विलास चाळके, आशफाक हाजु, ओंकार गर्दे, संदीप रहाटे, राजेश मुकादम, प्रसाद सुर्वे, संजय साळवी, पराग सावंत, राहूल चव्हाण व इतर ठेकेदार उपस्थित होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List