… तर फडणवीसांनी आधी मोदींचा पर्दाफाश करावा, संजय राऊत यांचे आव्हान
”खोट्या नरेटिव्हची सुरुवात नरेंद्र मोदींनी केली आहे. त्यामुळे जर देवेंद्र फडणवीसांना खोट्या नरेटिव्हचा पर्दाफाश करायचा असेल तर त्यांनी नरेंद्र मोदींपासून सुरुवात करावी, असे आव्हान संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.
”या वेळची लोकसभा वेगळी आहे. भाजपने बहुमत गमावलेलं आहे. कुबड्यांवरचे प्रधानमंत्री व त्यांचे कॅबिनेट आहे. यांचा सुंभ जळला पण पिळ आहे. हा पिळ उतरवण्याचं काम राहुल गांधी करतील याची आम्हाला खात्री आहे. जनतेच्या मनातील विरोधी पक्ष नेता देशाला मिळालाय संपूर्ण देश राहुल गांधी पदयात्रा करून फिरले. त्यांनी गेल्या दहा वर्षात अपमानाचे कडू घोट पचवले. घाव सोसले. हलाहल पचवून राहुल गांधीसारखा नेता देशासमोर ठाकलेला आहे. त्यामुळे लोकसभेचं कामकाज कसं होतंय याकडे देशाचं लक्ष लागून राहिलं आङे. गेल्या दहा वर्षात फक्त सरकारचा टाळकुटेपणा पाहता आला. एकतर्फी सरकारचं भजन पाहण्यात जनतेला रस नव्हता. आता विरोधी पक्ष आणि सरकारमधला सामना पाहायला त्यांना पाहायला मिळेल, असे संजय राऊत म्हणाले.
”लोकशाही ही देशातली सगळ्यात मोठी ताकद आहे. नरेंद्र मोदी हे लोकशाहीच्या छाताडावर पाय ठेवून गेली दहा वर्ष आपली सत्ता गाजवत होते. त्यांनी जनतेचा व विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी त्याविरोधात ठामपणे उभे राहिले. कोण राहुल गांधी विचारलं, शरद पवारांना ड्युप्लिकेट म्हटलं, उद्धव ठाकरेंना नकली संतान, नकली शिवसेना म्हटलं. आता ज्याला नकली म्हणताय ना ते किती असली आहे ते तुम्हाला दाखवून देऊ, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
विरोधकांनी उपाध्यक्ष पद मागिलेले असल्याविषयी पत्रकारांनी विचारले असता संजय राऊत यांनी चर्चा सुरू असल्याचे सांगितले. ”लोकशाहीत शेवटपर्यंत चर्चा सुरू असते. हुकुमशाहीमध्येही चर्चा होते. हिटलर मुसोलिन यांच्यासोबतही चर्चेचा प्रयत्न झाला होता. त्यांनी नकार दिल्यावर पुढे त्यांचं काय झालं ते सगळ्यांनी पाहिलेले आहे. लोकशाहीत चर्चेला कायम वाव असतो. नरेंद्र मोदी व त्यांच्या लोकांनी निकालावरून काही धडा घेतला असेल तर ते चर्चेला तयार होतील’, असे संजय राऊत म्हणाले.
भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत मतदान केल्याचे समोर आले आहे. याविषयी बोलताना संजय़ राऊत यांनी भाजप ने अशा प्रकारे देशातल्या 70 ते 80 जागा जिंकल्याचा दावा केला आङे. ”असे घोटाळे करून भाजपने अनेक जागा जिंकल्या आहेत. खोटारडेपणा, ईव्हीए घोटाळा, बोगस मतदान, यंत्रणा ताब्यात घेणं व नरेंद्र मेहता पॅटर्नने त्यांनी देशभरात 70 ते 80 जागा जिंकल्या, असे संजय राऊत म्हणाले.
आणिबाणीवरून टीका करणाऱ्या भाजपला संजय राऊत यांनी फटकारले, ”मोदींनी आताचं बोलायला हवं. पन्नास वर्षाच्या आणिबाणीवर मोदी आता छाती पिटत आहेत. आताच्या हुकुमशाहीवर बोला. तुम्ही हुकुमशाहीने जो लोकांचा घात केलाय, दडपशाहीवर बोला. पेपरफुटीवर देवेंद्र फडणवीस कशाला बोलतायत, त्यावर नरेंद्र मोदींनी बोलावं. उत्तर प्रदेशमधला एनडीएचा आमदार कॅमेरावर मान्य करतोय की देशातले सर्व पेपर मी फोडलेले आहेत. त्यामुळे यावर आता भाजपने बोलायला हवे. इंधिरा गांधींच्या नखाचीही सर यांना येणार नाही. त्या निर्भय बेडर आणि शूर व्यक्तीमत्त्व होत्या. त्यांनी कधीच कुणापुढे गुडघे टेकले नाहीत. त्या देशाच्या नेत्या होत्या. त्यांनी लोकशाहीची आराधना केली. त्यांनी निवडणूकीत पराभव पत्करला व खोटेपणा करून निवडणूका जिंकण्याचा प्रयत्न आणीबाणीतही केला नाही. त्यांनी पराभव पत्करला. त्य़ानंतर त्या पुन्हा निवडणूक लढल्या व लोकांनी त्यांना पुन्हा निवडून आल्या”, असे संजय राऊत म्हणाले.
”महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणूकीत लोकांसमोर जाणं हे धोकादायक आहे. लोकसभेचं मतदान उद्धव ठाकरे यांच्याकडे बघून जास्त प्रमाणात झालं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूकीतही बिन चेहऱ्याचे पुढे जाता येणार नाही”, असे संजय राऊत म्हणाले.
एकनाथ शिंदे यांच्या टीकेला उत्तर देताना संजय राऊत यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. ”एकनाथ शिंदे काय बोलतात त्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. ही भरकटलेली व बहकलेली माणसं आहेत. त्यांचं मुख्यमंत्रीपदच औटघटकेचं आहे. ते घटनाबाह्य बेकायदेशीर आहेत. बेकायदेशीर पणे सत्तेवर बसतात ते राजकीय दृष्ट्या मनोरुग्ण असतात”‘
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List