दुर्देवी ! दोन मुलींना वाचविण्याच्या प्रयत्नात मुलगाही बुडाला, नदीपात्रात बुडून तिघांचा मृत्यू
>> प्रसाद नायगावकर
यवतमाळ जिल्ह्यातील ढाणकी पासून जवळच असलेल्या सावळेश्वर येथील पैनगंगा नदीवर दोन मुली पाण्यात बुडाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. तर त्यांना वाचवण्यासाठी तर त्यांना वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतलेल्या दोघांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाला. तिघांच्या मृत्यूने सावळेश्वर गावावर एकच शोककळा पसरली आहे.
पाण्याचा अंदाज न आल्याने आंघोळीसाठी गेलेल्या दोन मुलींसह त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात एका मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सावळेश्वर येथे पैनगंगा नदीपात्रात घडली. कावेरी गौतम मुनेश्वर (15), अवंतिका राहुल पाटील (14), चेतन देवानंद काळबांडे (16), रा.सावळेश्वर, ता.उमरखेड, अशी मृतांची नावे आहे.
सावळेश्वर येथे मामाच्या घरी आलेली कावेरी व तिची मैत्रीण अवंतिका या दोघी गावाजवळून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. धुणे आटोपल्यानंतर या दोघीही अंघोळीसाठी पाण्यात उतरल्या. पाण्याचा अंदाज न आल्याने या दोघी खोल पाण्यात बुडू लागल्या. त्यांनी मदतीसाठी धावा सुरू केला. त्यांची आरडाओरडा ऐकू आल्याने याच ठिकाणी असलेले चेतन देवानंद काळबांडे आणि शुभम सिद्धार्थ काळबांडे हे दोघे मदतीसाठी धावले. या दोघांनीही नदीपात्रात उडी घेतली. घाबरलेल्या कावेरी आणि अवंतिकाने वाचवण्यासाठी आलेल्या चेतनला घट्ट पकडून ठेवले. त्यामुळे या तिघांचाही बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच गावकऱ्यांनी नदीपात्राकडे धाव घेतली. शुभमला वाचविण्यात गावकऱ्यांना यश आले. चौघांनाही नदीतून बाहेर काढून ढाणकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. डॉक्टरांनी कावेरी, अवंतिका आणि चेतन यांना मृत घोषित केले. शुभम याच्यावर प्रथमोपचार करून उपचारासाठी यवतमाळ येथे हलविले आहे.
चेतन देवानंद काळबांडे यांच्या वडिलांचा सुद्धा काही दिवसापूर्वी साप चावल्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता. तेव्हापासून चेतनची आई कविता ही चेतन सोबत राहत होती. बुधवारी चेतनच्या अशा अचानक मृत्यूने कविता या एकाकी पडल्या असून शासनाने तिला योग्य ती मदत करावी अशी मागणी गावकरी करत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List