पहिल्याच पावसात राममंदिराला गळती; जिथे रामलल्ला विराजमान तिथेच पाणी साचले
वाजतगाजत अनेक सेलिब्रिटींच्या मांदियाळीत अपूर्ण बांधकाम असलेल्या राम मंदिराचे घाईघाईत उद्घाटन करण्यात आले. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा नयनरम्य सोहळा झाला. असे राम मंदिर जगात कुठेच बांधले गेले नसल्याचा दावाही करण्यात आला. परंतु या अद्भुत वास्तुरचनेचा नमुना असलेल्या राम मंदिराच्या छताला पहिल्याच पावसात गळती लागली आहे. रामलल्ला विराजमान असलेल्या गाभाऱ्यात अनेक ठिकाणी पाणी झिरपू लागल्याची तक्रार मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनीच केली आहे. तसेच एक-दोन दिवसांत दुरुस्ती झाली नाही तर दर्शन आणि पूजा थांबवावी लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
पहिल्याच पावसात मंदिरात अनेक ठिकाणी पाणी झिरपू लागल्याचे दिसून आले. मंदिरातून पाणी बाहेर पडण्यासाठी रस्ताच नाही. त्यामुळे मंदिराचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान होऊ शकते. त्यामुळे लवकरात लवकर या गळतीवर उपाययोजना करावी अशी मागणी आचार्य सत्येंद्र दास यांनी केली आहे. दरम्यान, मंदिराचे काम होणे अद्याप बाकी आहे. 2025 मध्येही हे काम पूर्ण होणे अशक्य आहे. अशातच आतापासूनच मंदिराच्या बांधकामात अनेक त्रुटी असल्याचे समोर आले आहे.
छोटी मंदिरेही पाण्याने भरली
गर्भगृहाव्यतिरिक्त तेथे बांधण्यात आलेली छोटी मंदिरेही पाण्याने भरली. मंदिराची ही अवस्था पाहता बांधकामात नेमक्या कोणत्या त्रुटी राहिल्या याचा तपास करण्याची मागणीही सत्येंद्र दास यांनी केली आहे. पावसाचे पाणी मंदिरातून बाहेर जाण्यासाठी जागा नाही. त्यामुळे छतातून पाणी गळू लागल्यानंतर एकच गोंधळ उडाला.
राम मंदिरावर आतापर्यंत 1800 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
मुख्य शिखर, परकोटा, 5 छोटी शिखरे, 13 मंदिरे, ट्रस्ट ऑफिस, व्हीव्हीआयपी प्रतीक्षालय, प्रवासी सुविधा केंद्र, संग्रहालय, ग्रंथालय, संशोधन संस्था यांसह अनेक कामे अद्याप शिल्लक आहे. उर्वरित कामासाठी आणखी 2 हजार कोटी रुपयांचा खर्च येईल असे मंदिराचे डिझाईन आणि बांधकाम व्यवस्थापक गिरीश सहस्रभोजनी यांनी सांगितले.
गाभाऱ्यासमोरील मंडप 4 इंच पाण्याने भरला; मशालीच्या उजेडात आरती
शनिवारी रात्री 2 ते 5 दरम्यान जोरदार पाऊस झाला. त्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यासमोरील मंडप 4 इंच पाण्याने भरला. मंदिरातील लोकांना विजेचा धक्का बसण्याची भीती होती. त्यामुळे पहाटे 4 वाजता होणारी आरती मशालीच्या उजेडात करावी लागल्याचे सत्येंद्र दास यांनी सांगितले.
पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने मंदिरात पाणीगळतीची समस्या उद्भवत असल्याचे समोर आले आहे. पहिल्या मजल्यावर बांधकाम सुरू आहे. रॉड घालण्यासाठी छिद्रे शिल्लक आहेत. तेथून पाणी मंदिराच्या आत येत असल्याचा दावा सत्येंद्र दास यांनी केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List