मुंबईकरांच्या तलावात थेंबे थेंबे पाणी साचे! दररोज अडीच ते तीन हजार दशलक्ष लिटर पाण्याची भर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया तलावांत सध्या समाधानकारक पाऊस होत असून दररोज अडीच ते साडेतीन हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा होत आहे. त्यामुळे मुंबईला दररोज 3850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करूनही तलाव क्षेत्रात चार दिवसांत पाणीसाठय़ात अवघ्या 0.1 टक्क्यांची घट झाली आहे. यातच जोरदार पाऊस झाल्यास तलाव भरतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया भातसा व अप्पर वैतरणा वगळता अन्य पाच तलावांमध्ये 21 जूनला 76 हजार 909 दशलक्ष लिटर म्हणजे 5.31 टक्के पाणीसाठा होता. 24 जूनपर्यंत हा साठा 76 हजार 715 दशलक्ष लिटर म्हणजेच 5.30 टक्के इतका झाला. म्हणजेच चार दिवसांत सरासरी 194 दशलक्ष लिटर पाण्याची घट झाली. या चार दिवसांत मुंबई शहराला सुमारे 14 हजार दशलक्ष लिटरपेक्षा जास्त पाणीपुरवठा करण्यात आला. याचाच अर्थ गेल्या चार दिवसांत 13 हजार 800 दशलक्ष लिटर पाण्यामध्ये वाढ झाली, परंतु ही वाढ समाधानकारक नसून तलाव क्षेत्रात जोरदार पावसाची आवश्यकता आहे. तरच मुंबईकरांवरील पाणीटंचाईचे संकट दूर होईल असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत 144 ते 324 मिमी पाऊस झाला आहे. यामुळे आजूबाजूचे ओढे व छोटय़ा नद्या वाहू लागल्यामुळे हे पाणी तलाव क्षेत्रात जमा होत आहे. त्यामुळे दररोज पाणीसाठय़ात अडीच ते तीन हजार दशलक्ष लिटरने वाढ होत आहे. त्यामुळे तलाव क्षेत्रात जोरदार पाऊस होण्याची गरज आहे.
तलाव क्षेत्रातील पाऊस
अप्पर वैतरणा 144 मिमी
मोडक सागर 173 मिमी
तानसा 208 मिमी
मध्य वैतरणा 193 मिमी
भातसा 222 मिमी
विहार 292 मिमी
तुळशी 324 मिमी
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List