हे राम…पहिल्याच पावसात अयोध्येतील राम मंदिराच्या छताला गळती! कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारी महिन्यात उद्घाटन केलेल्या अयोध्येतील राम मंदिराला पहिल्याचा पावसात गळती लागली आहे. त्यामुळे मंदिराचे काम घाईगडबडीत उरकण्यात आल्याचे दिसत आहे. पहिल्याच पावसात या मंदिराला गळती लागल्याने भाविकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच या मंदिराच्या दर्जाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. तसेच फक्त लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत या मंदिराचे घाईघाईत उद्घाटन करण्यात आले का, असा संतप्त सवालही भाविक करत आहेत.
पुजाऱ्यांची बैठक व्यवस्था आणि व्हीआयपी दर्शनाच्या ठिकाणी पहिल्याच पावसात छतातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरु आहे. काही दिवसांपूर्वी मंदिराच्या गर्भगृहातील पाण्याचा निचरा होण्याबाबत मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी बांधकाम कंपनीच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यानंतर पहिल्या पावसातच होणारी छतगळतीमुळे केंद्र सरकारचे पितळ उघड पडले आहे. देश-परदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या रामलल्लाच्या मंदिराला पहिल्याच पावसात गळती लागल्याने संताप व्यक्त होत आहे.
या भागात रविवारी रात्री पहिला पाऊस झाला. त्यानंतर मंदिरातील पुजारींची बैठक व्यवस्था आणि व्हीआयपी दर्शनाच्या ठिकाणी छतातून पाणी गळती होऊन मंदिरात पाणी साचले. सोमवारी सकाळी पुजारी नियमित पूजेसाठी मंदिरात आले तेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आला. काही दिवसांपूर्वी मंदिरातील गर्भगृहात पाणी गळत होते, त्याची दुरुस्ती करण्यात आली. यानंतर पुन्हा दुसरीकडे गळती सुरु झाली. यामुळे राममंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी मंदिराच्या बांधकामात बेजबाबदारपणा केल्याचा आरोप केला आहे. राम मंदिराच्या बांधकामासाठी बंसी पहाडपूर येथील दगडांचा वापर करण्यात आला आहे. टाटा कन्सल्टन्सी आणि एलएनटी कंपनीने मंदिराचे बांधकाम केले असून, देशातील नामवंत अभियंत्यांनी मंदिराच्या निर्मितीसाठी आपले योगदान दिले आहे. मात्र पहिल्याच पावसात मंदिराच्या कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List