दहिवडीतून गहाळ झालेले 24 मोबाईल्स पाच जिल्हय़ांतून जप्त
दहिवडी पोलिसांनी गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी राज्यातील सातारा, सांगली, पुणे, संभाजीनगर, जालना या भागात जाऊन संबंधितांकडून 24 मोबाईल हस्तगत केले. यातील अनेकांचे मोबाईल गहाळ झाले होते, तर काहींचे मोबाईल चोरीला गेले होते.
दहिवडी पोलिसांच्या कामगिरीमुळे मोबाईलमधील आयएमआय नंबर जुळवून मोबाईल माघारी मिळविले. मोबाईल चोरांना व ते विकत घेणाऱयाला ही मोठी चपराक बसली आहे.
जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, दहिवडीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी नागरिकांचे हरविलेले मोबाईल शोधण्यासाठी पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करून सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पथकातील पोलीस स्टाफने सी.ई.आय.आर. पोर्टल व इतर तांत्रिक बाबींच्या आधारे हरविलेल्या मोबाईलबाबतची माहिती प्राप्त करून मोहीम राबविल्याने दहिवडी पोलीस ठाणे हद्दीतून नागरिकांचे गहाळ व चोरी झालेले एकूण 7 लाख 20 हजार रुपये किमतीचे एकूण 24 मोबाईल हस्तगत करण्यात यश आले आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या हस्ते तक्रारदारांना मोबाईलचे वाटप करण्यात आले.
दहिवडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस हवालदार बापू खांडेकर, पोलीस नाईक नितीन धुमाळ, नीलेश कुदळे, असिफ नदाफ, महेंद्र खाडे, सायबर पोलीस ठाण्याचे महेश पवार यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.
दहिवडी पोलिसांनी राज्यातील विविध भागात फिरून मोठय़ा प्रयत्नाने मोबाईल हस्तगत केले. ज्यांचे मोबाईल गहाळ किंवा हरवले असल्यास नागरिकांनी दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी, अशाच प्रकारे सातत्याने मोबाईलची शोधमोहीम राबविण्यात येणार असल्याचे दहिवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List