नीट-पीजी अचानक पुढे ढकलल्याने संतापाची लाट; केंद्र सरकारविरुद्ध परीक्षार्थी आक्रमक… प्रवासावर झालेला खर्च देण्याची मागणी
नीट आणि यूजीसी नेट पेपरफुटीनंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परीक्षेच्या अवघ्या बारा तास आधी नीट-पीजी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे देशभरातील परीक्षार्थ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. परीक्षेसाठी जी परीक्षा केंद्रे देण्यात आली होती, त्यामध्येही गोंधळ घातल्याचा आरोप परीक्षार्थ्यांनी केला आहे. वडोदरातील परीक्षार्थ्यांना नाशिक आणि मध्य प्रदेशातील परीक्षा केंद्रे देण्यात आली. परीक्षार्थी एक दिवस आधीच या शहरात दाखल झाले. मात्र अचानक परीक्षाच पुढे ढकलण्यात आली आहे. प्रवासात परीक्षार्थ्यांचे बरेच पैसे खर्च झाले. हे पैसे सरकार देणार का असा सवाल परीक्षार्थी करत आहेत.
नीट-पीजी परीक्षेच्या नव्या तारखांची लवकरच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून घोषणा करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे परीक्षार्थ्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल मंत्रालयाकडून खेदही व्यक्त करण्यात आला आहे. मात्र यावर परीक्षार्थ्यांचे समाधान झालेले नाही. केंद्राने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय काही दिवस आधी घ्यायला हवा होता. आयत्या वेळी परीक्षा पुढे ढकलून परीक्षार्थ्यांना वेठीस धरणे योग्य नाही, असे परीक्षार्थ्यांचे म्हणणे आहे. ढकलायची होती तर काही दिवस आधी हा निर्णय का घेतला नाही?
केंद्रीय आरोग्य मंत्री आणि शिक्षणमंत्र्यांनी माफी मागावी
केंद्रीय आरोग्य मंत्री आणि शिक्षण मंत्र्यांनी परीक्षार्थ्यांना होणाऱ्या त्रासाची जबाबदारी स्वीकारून जाहीर माफी मागावी, अशी मागणी नीट-पीजीच्या परीक्षार्थ्यांनी केली आहे. परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी परीक्षार्थ्यांनी खूप मोठा प्रवास केला आहे. या प्रवासावर परीक्षार्थ्यांचे पैसे आणि वेळदेखील खर्च झाला आहे. सरासरी दहा हजार रुपये बुडाले आहेत. केंद्र सरकारने विद्यार्थ्यांच्या खर्च झालेल्या पैशांची भरपाई करण्याची मागणीही केली जात आहे.
नीट-यूजीनंतरचा हा मोठा घोटाळा
युनायटेड डॉक्टर्स फ्रंट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. लक्ष्य मित्तल यांनी सांगितले, नीट-यूजीनंतर नीट-पीजी परीक्षा आयत्या वेळी रद्द करणे हा मोठा घोटाळा आहे. केंद्र सरकारने डॉक्टरांच्या भावनांशी खेळ मांडला असून नीट-यूजी आणि नीट-पीजी या परीक्षांच्या संचालक अधिकाऱ्यांची चौकशी होणे आवश्यक आहे. फेडरेशन ऑफ रेसिडन्ट डॉक्टर्स असोसिएशन इंडियाचे महासचिव डॉ. सर्वेश पांडे यांनी सांगितले, नीट-पीजी परीक्षा लवकरात लवकर आयोजित करणे महत्त्वाचे आहे. कोणतीही एजन्सी ही परीक्षा घेण्यास पात्र नसेल तर यासारखे देशाचे दुसरे दुर्दैव नाही!
नीट-यूजी परीक्षेचा पेपर फुटला, नीट-पीजी परीक्षेच्या निर्धारित वेळेच्या 12 तास आधी पुढे ढकलली, नीट-एसएससी परीक्षेची तारीख अद्याप जाहीर नाही. यावरून सरकारचा बेजबाबदारपणा दिसून येतो, असा आरोपही विद्यार्थ्यांनी केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List