नितीश कुमार, तेजस्वी यादव एकाच विमानाने दिल्लीला रवाना, NDA व INDIA आघाडीत सरकार बनवण्याच्या कवायती सुरू
लोकसभा निवडणुकीचे अंतिम निकाल आता हाती आले असून NDA ला 292 तर INDIA आघाडीला 235 जागांवर विजय मिळाला. भाजपला यावेळी स्पष्ट बहुमत मिळालेले नाही, त्यामुळे नितीश कुमार यांच्या JDU आणि चंद्राबाबू नायडू यांच्या TDP पक्षावर NDA ची भिस्त आहे. तर दुसरीकडे INDIA आघाडीनेही नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे वृत्त आहे.
निकाल लागल्यापासून दिल्लीत नवीन सरकार बनवण्याच्या कवायती सुरू झाल्या असून NDA आणि INDIA आघाडीने आज दिल्लीत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि माजी उपुख्यमंत्री तेजस्वी यादव एकाच विमानाने दिल्लीला रवाना होत आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण सुरू झाले आहे.
सकाळी 10 वाजून 40 मिनिटांच्या UK -718 विमानाने नितीश कुमार दिल्लीला रवाना होणार असून याच विमानाने तेजस्वी यादवही दिल्ली गाठणार आहे. नितीश कुमार NDA च्या बैठकीसाठी, तर तेजस्वी यादव INDIA आघाडीच्या बैठकीसाठी दिल्ली गाठत आहेत. मात्र नितीश कुमार यांचा राजकीय इतिहास पाहता ते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.
बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागा होत्या. यापैकी JDU आणि BJP ने प्रत्येकी 12 जागांवर विजय मिळवला, तर NDA तील घटकपक्ष लोकजनशक्ती पार्टी (पासवान) ने 5 जागा जिंकल्या. लालू प्रसाद यादव यांच्या RJD ने 4 जागा जिंकल्या. काँग्रेसला 3 आणि डाव्यांना 2 जागा मिळाल्या. पूर्णिया मतदार संघ पप्पू यादव यांच्या खात्यात गेला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List