आता 400 पार विसरा, 200 जागाही मिळणार नाही; मल्लिकार्जुन खरगेंचे भाजपवर टिकास्त्र
लोकसभा निवडणुकीच्या सहा टप्प्यांचे मतदान झाले असून आतापर्यंत जनतेचा कौल इंडिया आघाडीला दिसत आहे. आता सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान 1 जूनला होणार असल्याने या टप्प्यातील प्रचाराला वेग आला आहे. तसेच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. आता मोदी यांनी स्वतःच्या कामांकडे लक्ष देत त्याचा विचार करावा, असे खरगे म्हणाले आहेत. तसेच आता भाजपने 400 पार विसरावे, त्यांना 200 जागाही मिळणार नाही, असा टोलाही खरगे यांनी लगावला.
या निवडणुकीत भाजप आणि एनडीएच्या जागा मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत. तर काँग्रेससह इंडिया आघाडीच्या जागा वाढणार आहेत. त्यामुळे भआजपने आता 400 पारचा दावा विसरावा. त्यांना 200 जागांही मिळणार नाहीत. त्यामुळे त्यांचे सरकार येणार नाही, असा विश्वासही खरगे यांनी व्यक्त केला. भाजपचे तामिळनाडू, केरळ आणि तेलंगणामध्ये अस्तित्व नाही. कर्नाटकातही त्यांना स्थान नाही. महाराष्ट्रातही जनतेत भाजपविरोधात रोष आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्येही भाजपसमोर मोठे आव्हान आहे. त्यामुळे त्यांना 400 जागा मिळणे शक्यच नाही, त्यांच्या 200 जागाही येणार नाहीत, असे खरगे म्हणाले.
लोकसभा निवडणुकीनंतर खरगे नोकरी गमावतील, अशी टीका भाजपने केली होती. त्यालाही खरगे यांनी जबरदस्त प्रत्युत्तर देत पलटवार केला आहे. आपण राजकारणात नोकरीसाठी नाही, तर जनतेची सेवा करण्यासाठी राजकारणात आलो आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वयाएवढी वर्षे आपण राजकारणात आहोत. त्यामुळे मोदींनी निवडणुकीनंतर स्वतःच्या कामाचा विचार करावा, असा टोला खरगे यांनी लगावला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List