निवडणूक संपताच अजित पवारांना धक्का; जरंडेश्वर घोटाळ्याची एसीबी चौकशी सुरू
चौकशीची ‘ईडी’पीडा नको म्हणून मिंधेंच्या गोटात शिरलेले उपमुख्यमंत्री अजित पवार लोकसभा निवडणुकीचे मतदान संपताच एसीबीच्या रडारवर आले आहेत. जरंडेश्वर साखर कारखान्यातील कोटय़वधी रुपयांच्या घोटाळय़ाची पुणे एसीबीने चौकशी सुरू केली आहे. सत्तेत सोबत राहूनही ‘विश्वासघातकी’ मिंधेंनी हा मोठा धक्का दिल्यामुळे अजित पवारांची चिंता चांगलीच वाढली आहे.
जरंडेश्वर साखर कारखाना घोटाळय़ात ईडीने अजित पवार यांना दिलासा दिला होता. साखर कारखान्याची चौकशी करून आरोपपत्र दाखल करताना ईडीने आरोपी म्हणून असलेले अजित पवार यांचे नाव वगळले होते. मिंधेंच्या हातात हात मिळवला. त्याचदरम्यान ईडीने अजित पवार यांच्यावर ही कृपा दाखवली होती, मात्र आता लोकसभा निवडणुकीचे मतदान संपताच मिंधे सरकारने जरंडेश्वर कारखान्याची एसीबीमार्फत चौकशी सुरू केली आहे. सातारा येथील जरंडेस्वर साखर कारखान्यातील गैरव्यवहार, कोरेगाव येथील भूखंड तसेच डिस्टलरी प्रकल्पासंदर्भात पुणे एसीबीने चौकशीला वेग दिला आहे. कारखाना व भूखंडांशी संबंधित सर्व व्यवहारांची झडती घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अजित पवार पुन्हा मोठय़ा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीचे मतदान संपताच एसीबीने डोके वर काढले. त्यामुळे अजित पवार यांना मिंधेंनी दिलेला हा मोठा धक्का मानला जात आहे.
जरंडेश्वरचा गोलमाल
कर्जामध्ये बुडालेला जरंडेश्वर कारखाना अजित पवार यांच्या गुरू कमोडिटी या प्रायव्हेट लिमिटेड पंपनीने लिलाव प्रक्रियेतून खरेदी केला होता. ती लिलाव प्रक्रिया बोगस होती, असा आरोप करीत शालिनीताई पाटील यांनी कोर्टाचे दार ठोठावले. त्यावर उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मुंबई ईओडब्ल्यूकडे गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर ईडीने चौकशी सुरू केली होती.
अजितदादांची प्रचाराकडे पाठ
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबई, ठाणे परिसरातील प्रचाराकडे अजित पवार यांनी पाठ फिरवली होती. त्यावेळी ‘महायुती’त काही आलबेल नसल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर काही दिवसांतच एसीबी चौकशी सुरू होऊन अजित पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
निवडणुकीपूर्वी ईडी, पोलिसांची कृपा
निवडणुकीपूर्वी अजित पवार यांना ईडीसह मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) कृपा दाखवली होती. ईओडब्ल्यूने शिखर बँक घोटाळय़ात अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा यांना क्लीन चिट दिली होती, मात्र निवडणूक संपताच एसीबी सक्रिय झाल्यामुळे अजितदादांच्या नशिबाचे ‘काटे’ उलटे फिरू लागले की काय, अशी चर्चा जोर धरत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List