वादानंतर शालेय शिक्षण विभागाला उपरती; दहावीपर्यंत मराठी व इंग्रजी विषय अनिवार्य
राज्य अभ्यासक्रम आराखडय़ाचा मसुदा जाहीर झाल्यानंतर उद्भवलेल्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न शालेय शिक्षण विभागाने केला आहे. या मसुद्यातील प्रमुख वैशिष्टय़े काय आहेत याबाबतचे परिपत्रक जारी करून शिक्षण विभागाने आराखडय़ात काही सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार राज्यात पहिली ते दहावीसाठी मराठी व इंग्रजी हे दोन विषय अनिवार्य असल्याचे शालेय शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. तसेच तिसरीपासून व्यावसायिक शिक्षणाची सोय, अकरावी, बारावीसाठी दोन भाषा विषय, एकाच वेळी विज्ञान, कला तसेच वाणिज्य शाखेतील विषय निवडण्याचे स्वातंत्र विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने जाहीर केलेल्या अभ्यासक्रमाच्या मुसद्यात मराठी भाषेला डावलले जात असल्याने राज्यभरातून या मसुद्यावर जोरदार टीका सुरू होती. या पार्श्वभूमीवर भाषा विषयांसाठी आता बदल करण्यात आला आहे. या बदलानुसार स्तरनिहाय व इयत्तानिहाय क्षमता यांची स्पष्टता आणण्यात आली आहे. दहावीपर्यंत मराठी आणि इंग्रजी विषय अनिवार्य करण्याबरोबरच सहावीपासून हिंदी, संस्कृतसह अन्य हिंदुस्थानी आणि परदेशी भाषा शिकण्याचा पर्यायही देण्यात आला आहे.
हरकती, सूचनांसाठी मुदतवाढ द्या
राज्य अभ्यासक्रम आराखडय़ाच्या मसुद्यावर हरकती व सूचना पाठविण्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी शिक्षण क्षेत्रात काम करणाऱया राज्यातील 23 संस्थांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे. सुमारे 350 पानांचा हा मसुदा आहे. समाजातील सर्व घटकांतून या मसुद्यावर अभिप्राय येणे आवश्यक आहे. मात्र त्यासाठी 3 जूनपर्यंतचा कालावधी अपूर्ण असून ही मुदत 30 जूनपर्यंत वाढवून देण्याची मागणी या 23 संघटनांचे प्रतिनिधी सुशील शेजुळे यांनी केली आहे.
3 जूनपर्यंत अभिप्राय पाठविता येणार
राज्य अभ्यासक्रम आराखडय़ाचा मसुदा तसेच सुचविलेल्या सुधारणा या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. मसुद्यावर समाज घटकांनी 3 जूनपर्यंत आपले अभिप्राय नोंदवावेत, या अभिप्रायानुसार राज्य अभ्यासक्रम आराखडय़ात आवश्यक सुधारणा करण्यात येणार असल्याचे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने स्पष्ट केले आहे.
मसुद्यातील वैशिष्टय़े
– तिसरी ते आठवी पूर्व व्यावसायिक काwशल्ये
– नववीपासून विशेष व्यावसायिक शिक्षण
– गणित, विज्ञान विषयांचे दोन स्तरावरील अभ्यासक्रमांचा विचार
– शालेय शिक्षणात हिंदुस्थानी ज्ञान प्रणाली, पर्यावरण आणि शाश्वत विकासावर भर
– शाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व समुपदेशनाची सोय
– शालेय कार्यपद्धती कशी असावी याचे मार्गदर्शन
– शाळांच्या मानांकनासाठी तरतूद
– परीक्षेत सत्र पद्धतीचा वापर
– बोर्ड परीक्षांद्वारे मूल्ये आणि स्वभाववृत्तीचे मूल्यमापन
– अभ्यासक्रमात कला शिक्षणाला महत्त्व
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List