7 जूनपर्यंत रस्ते वाहतूक योग्य करा, अन्यथा काम काढून घेणार; पालिकेचा कंत्राटदारांना इशारा
पावसाळा अवघ्या काही दिवसांवर आला असताना मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्याची कामे अर्धवट स्वरूपात आहेत. याचा मोठा फटका पावसाळय़ात नागरिकांना बसण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदारांनी शिल्लक कामे 31 मेपर्यंत पूर्ण 7 जूनपासून रस्ते वाहतूक योग्य न केल्यास कामे काढून घेतली जाणार आहेत. यानंतर ही कामे दुसऱया कंत्राटदाराला देण्यात येणार असून याचा खर्चही हलगर्जी कंत्राटदाराकडून वसूल करण्यात येणार असून दंडही वसूल केला जाणार असल्याचे निर्देश आज पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले.
मुंबईत पालिकेच्या अखत्यारीत सुमारे 2 हजार किमीचे रस्ते आहेत. हे सर्व रस्ते काँक्रीटचे करण्याचे धोरण पालिकेने आखले आहे, मात्र सद्यस्थितीत अनेक रस्त्यांची कामे अर्धवट असल्याने पावसाळय़ात पाणी तुंबल्याने गैरसोय होण्याचा धोका आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबईत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामात दिरंगाई आणि गुणवत्तेशी तडजोड अजिबात खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा पालिकेने कंत्राटदारांना दिला आहे. पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार पावसाळापूर्व कामे सुरू असून आज अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी रस्ते कामांची पाहणी करून कामात दिरंगाई करणाऱया कंत्राटदारांना सज्जड इशारा दिला. पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्त्यांची सर्व कामे पूर्ण करावीत, रस्ते वाहतूक योग्य करावेत, पावसाळय़ात कोणत्याही रस्त्याचे काम सुरू ठेवून नागरिकांची गैरसोय करू नये, असे निर्देश आयुक्तांनी याआधीच दिले आहे.
काम समाधानकारक नसल्यास बजावणार नोटीस
रस्त्यांची कामे 31 मेपर्यंत पूर्ण करावीत आणि या कामांचे मूल्यमापन करून समाधानकारक काम नसल्यास संबंधित कंत्राटदारांना नोटीस बजावण्यात यावी, असे निर्देशही बांगर यांनी प्रशासनाला दिले आहेत. याकडे दुर्लक्ष करणाऱया कंत्राटदारांवर काम काढून घेणे, दंड करणे आणि खर्च वसूल करण्याची कारवाई होणार आहे. दरम्यान, रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, रस्त्याकडचा राडारोडा तत्काळ उचलून घ्यावा असे निर्देशही बांगर यांनी दिले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List