सरकार-प्रशासन ‘AC’ मध्ये कूल ; बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची दिशाभूल, विजय वडेट्टीवार यांचे टीकास्त्र
प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शेकडो शेतकऱ्यांना जीवघेण्या उन्हात बियाण्यांसाठी तासनतास रांगेत ताटकळत उभे राहवे लागत आहे. सरकार आणि प्रशासन एसीमध्ये कूल असून बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, अकोला जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला म्हणून कलम 144 लागू करण्यात आले आहे. असे असतानाही प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शेकडो शेतकऱ्यांना जीवघेण्या उन्हात बियाण्यांसाठी तासन्तास रांगेत ताटकळत ठेवले आहे. शेतकरी कपाशीच्या बियाण्यांसाठी धडपड करीत आहे. रांगेत लागून बियाणे मिळविण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण प्रश्न वर्षभराच्या जगण्याचा आहे. वडेट्टीवार पुढे म्हणाले की, बाजारात शेतकऱ्यांना हव्या असलेल्या नेमक्या बियाण्यांचा तुटवडा आहे. तुटवडा असल्याचे कारण पुढे करून प्रत्येक शेतकऱ्याला केवळ दोन पाकिट देण्यात येत आहे. दहा-वीस एकराचा शेतकरी या दोन पाकीट बियाण्यांमध्ये पेरणी कशी करणार? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
सरकार आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चेही काढले. तक्रारी करण्यात आल्या. परंतु संवेदनशीलता हरविलेल्या राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेतली नाही. असे म्हणत वडेट्टीवार म्हणाले की, शेतकऱ्यांच्या संतापाचा कडेलोट होण्याची पुरती कल्पना असल्याने आता पोलीस संरक्षणात बियाणे विक्री केली जात आहे. कंपनीने आता अधिकचा पुरवठा करू शकणार नाही, असे पत्रच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना पाठविले आहे. म्हणून दुसऱ्या कंपन्यांचे बियाणे खरेदी करण्यासाठी अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांवर दबाव टाकण्यात येत आहे. आम्ही दोन-दोन पक्ष कसे फोडले, गळ्याचा पट्टा कसा काढला, दादा-भाई वर अन्याय कसा झाला यासारख्या विषयांवर दिवसभर प्रतिक्रिया देत सुटणारे महायुतीतील नेते या शेतकऱ्यांच्या ह्या अवस्थेवर अजूनही गप्प आहेत. सत्तेचे गुऱ्हाळ चालविण्यात व्यस्त असल्याचे वडेट्टीवार यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटल आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List