अमित शहांनी फोडला आणखी एक ‘जुमला’; 130 कोटी लोकांना सरकारी नोकऱ्या देणे शक्य नाही!
Lok Sabha Election 2024: दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना रोजगार देऊ असे आश्वासन नरेंद्र मोदी सरकारने दिले होते. मात्र गेल्या दहा वर्षांत ते पूर्ण केले नाही. तो केवळ एक जुमला होता. रोजगार मिळालाच नाही आणि देशातील बेरोजगारीने परिसीमा गाठली. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आणखी एक जुमला पह्डला आहे. देशातील 130 कोटी लोकांना सरकारी नोकऱ्या देणे सरकारला शक्य नाही, असे सांगतानाच, रोजगार म्हणजे सरकारी नोकरी असे कुणीही गृहित धरू नये, असे विधान शहा यांनी केले.
अमित शहा यांनी दिल्लीतील त्यांच्या कृष्ण मेनन मार्गावरील निवासस्थानी एका इंग्रजी दैनिकाला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी देशातील बेरोजगारीबद्दल भाष्य केले. मोदी सरकार लोकांना नोकऱया देण्यात अपयशी ठरल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून सातत्याने केला जात आहे. त्याबद्दल बोलताना अमित शहा म्हणाले की, 130 कोटी लोकसंख्येसाठी सरकारी नोकरी देणे कोणत्याही सरकारला शक्य नाही. मोदी सरकारने 1 लाख 17 हजार स्टार्टअप कंपन्यांची सुरूवात केली आहे. त्यातून रोजगार निर्मिती होऊ शकते, असा दावाही अमित शहा यांनी केला.
भाजपला सत्ता स्थापनेसाठी बहुमताचा आकडा गाठता येणार का असा सवाल यावेळी अमित शहा यांना केला गेला. त्यावर पाचव्या टप्प्यातच भाजप 300 ते 310 जागांच्या दरम्यान पोहोचला आहे, त्यात सहाव्या आणि सातव्या टप्प्यातील जागांचीही नंतर भर पडेल, असा दावा अमित शहा यांनी केला.
रोजगाराच्या प्रश्नावर स्वयंरोजगाराचे तुणतुणे
रोजगार देता आले नाहीत याबद्दल अमित शहा यांनी या मुलाखतीमध्ये काहीही स्पष्ट केले नाही. रोजगाराचा मुद्दा त्यांनी सराईतपणे स्वयंरोजगाराकडे वळवला. स्वयंरोजगारासाठी 47 कोटी लोकांनी प्रत्येकी 20 लाखांचे मुद्रा लोन घेतले आहे. ही रक्कम मोठी नसली तरी रोजगार निर्माण करण्यासाठी पुरेशी आहे, असे अमित शहा म्हणाले. 85 लाख पथारी विक्रेत्यांनी स्वनिधी लोन घेतले आहे, त्यातून रोजगार निर्मिती होणार नाही का? असा प्रतिप्रश्न करत त्यांनी सारवासारव केली.
पंच्याहत्तरीचा पक्षात कोणताही नियम नाही!
वयाची 75 वर्षे पूर्ण झाल्यानंतर नरेंद्र मोदींना भाजपच्या नियमानुसार निवृत्त व्हावे लागणार आहे. त्यावरून विरोधी पक्षांकडून सातत्याने निशाणा साधण्यात आला. याबाबत अमित शहा यांना यावेळी विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले की, प्रथमतः असे कोणतेही नियम पक्षात नाहीत. काही निर्णय विशिष्ट परिस्थितीत घेतले गेले. जेव्हा ती परिस्थिती अस्तित्वात नसते, तेव्हा ते नियम नसतात. 2029 मध्येही मोदीच आमचे नेतृत्व करतील, हे मी स्पष्ट करतो.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List