कडक उन्हामुळे मालवाहतुकीच्या 520 कोटींची वाफ; महाराष्ट्रात 39 कोटींचा फटका
>> दीपक पवार
देशभरात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आली असून कडक उन्हामुळे दिवसाला मालवाहतुकीच्या तब्बल 520 कोटींची वाफ म्हणजेच नुकसान होत असल्याचे समोर आले आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार अनेक वाहतूक कंपन्या दिवसाही माल पोहोचवतात, परंतु दिवसा 11 ते दुपारी 4 कडक उन्हामुळे शक्यतो रात्रीच मालवाहतूक करण्यात येत आहे, तर दिवसा अवजड माल ट्रकमध्ये भरण्यासाठी दुप्पट मनुष्यबळ लागत आहे. परिणामी, एका ट्रकमागे दिवसाला तब्बल 3 हजार रुपयांचे नुकसान होत आहे, तर महाराष्ट्रात दिवसाला तब्बल 39 कोटी रुपयांचा फटका पडत असल्याचे उघड झाले आहे.
देशभरात जवळपास 1.84 कोटी वाहने नोंदणीकृत आहेत. तर महाराष्ट्रात ही संख्या 17 लाख 32 हजार 175 इतकी आहे. महाराष्ट्रातही अनेक भागात उष्णतेने कहर केला असून पारा 40 डीग्री सेल्सियसच्या पुढेच आहे. त्यामुळे मालवाहतूक करताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत असल्याचे ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे कोअर कमिटी अध्यक्ष बाल मलकीत सिंग यांनी सांगितले.
मुंबईत पवई, घाटकोपर, कळंबोलीत त्रास
मुंबईत पवई, साकीनाका, घाटकोपर, कळंबोलीत तर पश्चिम उपनगरात लिंक रोड, मालाड, कांदिवली, बोरिवली येथे प्रचंड वाहतूककोंडी होते, तर खराब रस्त्यांमुळे गाडीची वाट लागते. गाडीचा देखभाल खर्च आणखी वाढतो असे वाहनचालक राजन सिंग यांनी सांगितले. गाडी थोडी चालवली की लगेच गरम होते, त्यामुळे गाडी थांबवावी लागते. परिणामी, माल पोहोचवण्यास वेळ लागतो असेही ते म्हणाले.
डिझेलवर प्रचंड खर्च, गाडीही काम काढते
उन्हाळय़ात मालवाहतूक करणे अत्यंत जिकरीचे होऊन बसते. दिवसा मालवाहतूक करताना गाडी धावतेय असे वाटतच नाही. गाडी प्रचंड डिझेल खाते. तसेच इंजिन गरम झाल्यामुळे गाडी कामही देते. त्यामुळे नुकसानीचा सामना करावा लागत असल्याचे वाहनचालक बोदई सिंग यांनी सांगितले.
उत्पादकता 40 टक्क्यांनी घटली
देशभरात मालवाहतूक मोठय़ा प्रमाणावर होते, परंतु उष्णतेच्या लाटेमुळे मालवाहतुकीतील उत्पादकता 40 टक्क्यांनी घटली आहे. ज्या ठिकाणी एका ट्रकमागे 7 ते 8 हजार रुपयांचे काम होते तेथे एका ट्रकमागे 2 ते 3 हजार रुपयांचे नुकसान होत असल्याचे मालवाहतूकदारांचे म्हणणे आहे.
कडक उन्हाळा असल्यामुळे लोडिंग आणि अनलोडिंगसाठी बराच वेळ लागतो. प्रचंड घाम येत असल्यामुळे आणि थकवा वाढत असल्यामुळे मोठय़ा संख्येने कामगार आजारी पडतात. त्यामुळे आपोआपच मालवाहतुकीवर परिणाम होतो. उन्हाळय़ात खराब रस्ते आणि कडक ऊन अशा दुहेरी आव्हानांचा सामना करावा लागतो.
– बाल मलकित सिंग, कोअर कमिटी अध्यक्ष, ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट असोसिएशन.
– उन्हाळय़ात रात्रीही रस्ता गरमच असतो. त्यामुळे टायर फुटून अपघात होतात. रात्रीची वेळ असल्यानेही मोठय़ा प्रमाणावर अपघात होतात.
– अंगातून घामाच्या धारा वाहतात. त्यामुळे शरीरातील पाणी कमी होते. हे लक्षात घेऊन गाडीत पुरेसे पाणी ठेवावे लागते.
– अनेक वाहनचालक उन्हाळय़ात आजारी पडतात. त्याचा परिणाम मालवाहतुकीवर होतो. मनुष्यबळ कमी असते त्यामुळे प्रचंड नुकसान होते.
– खराब रस्त्यांमुळे मालवाहतुकीला वेळ लागतो. खड्डय़ांमुळे एयर सस्पेन्शनपासून ते अगदी इंजिनपर्यंत सर्वच मेन्टेन ठेवावे लागते. खड्डय़ांमुळे मालाचे नुकसान होते ते वेगळे. गाडी महिन्यातून तीन दिवस गॅरेजला लावावी लागते.
– देशात राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश तर महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाडय़ात मालवाहतूक करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List