राज्यातील कायदा सुव्यवस्था रसातळाला, गृहमंत्र्यांची काही जबाबदारी आहे का नाही? : अतुल लोंढे
महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. 2014 पासून गृहमंत्रालय सांभाळणारे देवेंद्र फडणवीस हे राज्याला लाभलेले सर्वात निष्क्रीय व बेजबाबदार गृहमंत्री आहेत. पुण्यात दोन तरुणांना कारखाली चिरडून मारले जाते, जळगावातही तसाच प्रकार घडतो आणि आता कायद्याचे रक्षक असलेले तहसिलदार यांच्यावर भरदिवसा हल्ला होतो, गृहविभाग काय करतो, याचे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला द्यावे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.
राज्यातील बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेवर हल्लाबोल करताना अतुल लोंढे पुढे म्हणाले की, इंदापूरच्या तहसिलदारांवर भरदिवसा समाजकंटकांनी हल्ला केला, असे प्रकार सातत्याने होत आहेत. राज्याचा गृहमंत्री जर कणखर असेल तर गुन्हेगारांना चाप बसतो पण देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून गुन्हेगारांवर वचक बसण्याऐवजी त्यांचे मनोधैर्य वाढल्याचे दिसते. महाराष्ट्र व राज्यातील जनता फडणवीसांच्या काळात सुरक्षित राहिलेली नाही पण फडणवीस हे फारसे गांभिर्याने घेत नाहीत. “गाडी खाली कुत्रा जरी आली तरी विरोधक राजीनामा मागतात”, असे बेजबाबदार विधान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस करतात. माणसे किड्या मुंग्यासारखी मारली जातात, गाडीखाली चिरडली जातात तरीही गृहमंत्र्यांला त्याचे काहीच वाटत नसेल तर अशा व्यक्तींनी खर्चीवर बसावेच का? फडणवीसांना गृहमंत्रीपद झेपत नाही हे त्यांच्या काळातील घटना पाहून स्पष्ट दिसते पण ते वस्तुस्थिती स्विकारत नाहीत. कायदा सुव्यवस्थेबद्दल गहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनाच प्रश्न विचारणार, का त्यालाही पंडित जवाहरलाल नेहरुच जबाबदार आहेत, नेहरुच फडणवीसांना काम करु देत नाहीत का? असा खोचक टोलाही अतुल लोंढे यांनी लगावला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List