Dombivli blast update – मृतांचा आकडा 11 वर, कंपनीच्या मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
डोंबिवलीतील एमआयडीसी फेस-2मधील अमुदान केमिकल कंपनीत गुरुवारी दुपारी बॉयलरचा भयंकर स्फोट झाला. या स्फोटातील मृतांचा आकडा वाढला आहे. अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या बचाव पथकाला शुक्रवारी सकाळी आणखी तीन मृतदेह आढळून आले आहेत. त्यामुळे मृतांची संख्या 11 वर पोहोचली आहे.
अद्यापही काही जण बेपत्ता असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असून घटनास्थळी शोधमोहीम युद्ध पातळीवर सुरू आहे. स्फोटानंतर एमआयडीसी परिसरामध्ये केमिकलच्या वासामुळे दुर्गंधी पसरली आहे. दरम्यान, स्फोट झालेल्या कंपनीचे मालक मेहता यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आठ वर्षांत 36 स्फोट; 35 कामगारांचा मृत्यू, शेकडो जायबंदी
रोजचे प्रदूषण, स्फोट, वायूगळती आणि आगीच्या घटनांमुळे डोंबिवली एमआयडीसी डेंजर झोन बनली आहे. गुरुवारी अमुदान कंपनीत झालेल्या भीषण स्फोटाने डोंबिवली पुन्हा एकदा हादरली. गेल्या आठ वर्षांत एमआयडीसीत 36 स्फोट झाले असून 35 कामगारांना आपला जीव गमवावा लागला तर शेकडो जण जायबंदी झाले आहेत. वारंवारच्या दुर्घटनामुळे नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली असून डोंबिवली भोपाळच्या वाटेवर तर नाही ना, अशी चिंता शहरवासीयांना सतावू लागली आहे.
डोंबिवली एमआयडीसीतील प्रदूषणामुळे नागरिकांचा जीव मेटाकुटीला आला आहे. कधी हिरवा पाऊस तर कधी गुलाबी पाऊस, केमिकल कंपन्यांतील वायू गळती आणि स्फोट यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या समस्येची गंभीर दखल घेत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डोंबिवलीला भेट देऊन आढावा घेतला होता. लोकांचा जीव महत्त्वाचा आहे. आपण जगण्यासाठी मरण पोसत आहोत का? असे खडे बोल सुनावत प्रदूषणाची समस्या पुन्हा उद्भवणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश दिले होते. यानुसार कंपन्यांमध्ये सुरक्षा विषयक उपकरणे बसवण्याचे काम सुरू झाले. शिवाय तातडीने धोकादायक कारखाने अन्यत्र हलवण्याचा प्लॅन प्रशासन तयार करत होते. मात्र याचवेळी गद्दारी करून भाजप आणि मिंधेंनी सरकार पाडले. त्यानंतर सर्व काही ठप्प झाले. धोकादायक आणि नियम धाब्यावर बसवणाऱ्या कंपन्यांना मिंर्धेच्या काही बगलबच्च्यांनी पाठीशी घातल्याने डोंबिवलीत प्रदूषणाची समस्या अधिकच वाढत राहिली.
गुरुवारी अमुदानमध्ये झालेल्या भयंकर स्फोटामुळे या धोकादायक कंपन्या डोंबिवलीकरांसाठी काळ बनल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. वायू गळती आणि स्फोटाची थेट झळ एमआयडीसी निवासी भाग, आजदे, सोनारपाडा, सागर्ली, सागाव, नांदिवली, गुळवली, दावडी, गांधीनगर, गोग्रासवाडी, शीळ रोड, खंबाळपाडा, रिजन्सी कॉम्प्लेक्स या भागातील 90 हजारांहून अधिक रहिवाशांना बसते. धोकादायक कंपन्यांबाबत प्रशासन गंभीर नसून सरकारने आम्हाला भोपाळच्या वाटेवर नेवून ठेवल्याचा संताप यावेळी नागरिक व्यक्त करत होते.
एमआयडीसीतील दुर्घटना
- 26 मे 2016 : डोंबिवली फेज 2 मधील प्रोबेस कंपनीत भीषण स्फोट. 12 जणांचा मृत्यू तर 225 जखमी.
20 नोव्हेबर 2017 : अल्यू फाईन कंपनीतील एअर कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्याने दोन कामगार जखमी
9 ऑक्टोबर 2018 : डोंबिवली एमआयडीसीमधील आगीत रबर कंपनी खाक
9 सप्टेबर 2019 : पेरोक्सी केमिकल कंपनीत रिअॅक्टर स्फोटात एक कामगार जखमी
3 ऑगस्ट 2020 : अंबर केमिकल्समध्ये स्फोट होऊन कंपनी भुईसपाट
पाच कंपन्या सर्वाधिक घातक
डोंबिवली एमआयडीसीत 432 कारखाने आहेत. पैकी पाच केमिकल कंपन्या सर्वाधिक घातक आणि अतिधोकादायक असल्याची बाब माहिती अधिकारात सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांना मिळाली. यानुसार राज्य शासनाने गणेश पॉलिकेम, घरडा केमिकल, ऑक्टल प्रोडक्शन, मेट्रो पॉलिटेन, क्वालिटी इंडस्ट्रीज या कंपन्यांना उत्पादन बंद करून तळोजा एमआयडीसीत स्थलांतरित करण्याचे आदेश औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाने दिले होते. मात्र हा आदेश आजतागायत कागदावरच आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List