बेटी ज्ञानाची पेटी बारावी निकालात, यंदाही मुलींचीच बाजी
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यंदा 93.37 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्याचा निकाल यंदा 2.12 टक्क्यांनी वाढला. यात बेटी म्हणजे केवळ धनाचीच नाही तर ज्ञानाचीही पेटी असल्याचे अधोरेखित झाले. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली असून छत्रपती संभाजीनगरातील राष्ट्रीय स्तरावरील बुद्धिबळपटू तनिषा सागर बोरमणीकर हिला बारावीत कॉमर्स शाखेत 100 टक्के गुण मिळाले. पैकीच्या पैकी गुण मिळविणारी ती राज्यातील एकमेव विद्यार्थिनी ठरली आहे.
यंदा प्रथमच प्रात्यक्षिक, तोंडी आणि अंतर्गत श्रेणी परीक्षांचे गुण ऑनलाइन पद्धतीने भरून घेण्यात आले होते. त्यामुळे यंदा निकाल लवकर जाहीर करण्यास मदत झाल्याचे राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले. तसेच यंदा कॉपी प्रकरणांनाही आळा बसला असून शिक्षण मंडळाने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे गेल्या वर्षीपेक्षा यंदा कॉपी प्रकरणांना आळा बसल्याचेही गोसावी म्हणाले.
बुद्धिबळपटू तनिषा बारावीच्या परीक्षेत चमकली
बारावीच्या परीक्षेत छत्रपती संभाजीनगरातील देवगिरी कॉलेजची विद्यार्थिनी तनिषा सागर बोरमणीकर हिला बारावीच्या परीक्षेत कॉमर्स शाखेत 100 टक्के गुण मिळाले आहेत. यंदा बारावीत 100 टक्के गुण मिळविणारी तनिषा ही राज्यातील एकमेव विद्यार्थिनी ठरली आहे. तिला एकूण 518 गुण मिळाले असून क्रीडा कोटय़ातील 18 क्रीडा गुण तिने पटकावले आहेत. त्यामुळे तिला 600 पैकी 600 गुण मिळाले आहेत. तनिषाच्या निकालावर नजर टाकल्यास तिला ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट, पाली व अर्थशास्त्र विषयांत शंभरपैकी 100 गुण मिळाले आहेत, तर इंग्रजी विषयात 89 गुण, बुक कीपिंग अॅण्ड अकाऊंटन्सी विषयात 95 गुण, तर सेव्रेटरियल प्रॅक्टिस या विषयात 98 गुण आहेत. तनिषा ही राष्ट्रीय स्तरावरील बुद्धिबळपटू आहे. तिने आठ वर्षांखालील स्पर्धेत हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच ओपन नॅशनल्स आणि राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेतला होता. बुद्धिबळाच्या खेळासोबतच तनिषाने बारावीच्या परीक्षेतही चमकदार कामगिरी दाखवली. वाणिज्य शाखेच्या विद्यार्थिनीने 100 टक्के गुण मिळवणे काwतुकास्पद आहे. खेळात केलेली मेहनत आणि अभ्यासातील सातत्य यांचा परिणाम या विद्यार्थिनीच्या निकालात दिसतो, असे काwतुक राज्य शिक्षक मंडळ अध्यक्ष शरद गोसावी यांनी केले राज्य शिक्षण मंडळातर्फे तनिषाचा सत्कार केला जाणार असल्याचेही गोसावी म्हणाले.
एकूण 45,083 पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांपैकी 22,463 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालाची टक्केवारी 49.82
एकूण 40,795 खासगी विद्यार्थ्यांपैकी 34,988 विद्यार्थी, उत्तीर्ण टक्केवारी 85.76
एकूण 6986 दिव्यांग विद्यार्थ्यांपैकी 6581 विद्यार्थी उत्तीर्ण, निकालाची टक्केवारी 94.20
सहा माध्यमांतील 154 विषयांची परीक्षा झाली. त्यापैकी 26 विषयांचा निकाल 100 टक्के.
20,910 विद्यार्थ्यांना क्रीडा, एनसीसी, स्काऊट-गाईडसाठी प्रावीण्याचे गुण
राज्यातील 2 हजार 247 कॉलेजचा निकाल 100 टक्के.
एकूण 21 कॉलेजचा निकाल शून्य टक्के. यात पुणे 3, नागपूर 10, छत्रपती संभाजीनगर 3, मुंबई 2, कोल्हापूर, नाशिक, कोकण 0, अमरावती 2, लातूर 1.
100 टक्के गुण… छत्रपती संभाजीनगरची तनिषा राज्यात प्रथम
तनिषा बोरमणीकरने तिच्या यशाचे श्रेय शिक्षक आणि कुटुंबीयांना दिले आहे. खेळामुळे माझा अभ्यास बुडायचा, पण कॉलेजने मला नेहमीच सांभाळून घेतले असे ती म्हणाली. मला चार्टर्ड अकाऊंटमध्ये करीअर करायचे असून त्यादृष्टीने मी तयारी सुरू केली आहे, असे तनिषाने सांगितले.
मुंबई शेवटी
विभागनिहाय निकाल पाहता कोकणचा नंबर 1 यंदाही कायम असून मुंबईने सलग दुसऱया वर्षी निराशाजनक कामगिरी केली आहे. मुंबईचा निकाल यंदाही सर्वात कमी लागला आहे.
विभागनिहाय निकाल
कोकण 97.51
नाशिक 94.71
पुणे 94.44
कोल्हापूर 94.24
लातूर 93.36
छत्रपती संभाजीनगर 94.08
अमरावती 93.00
नागपूर 92.12
मुंबई 91.95
बारावीच्या सर्व शाखा मिळून एकूण 14 लाख 23 हजार 970 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 13 लाख 29 हजार 684 जण उत्तीर्ण झाले आहेत. यंदाही मुलींचा निकाल मुलांच्या तुलनेत जास्त असून 95.44 टक्के मुली, तर 91.60 टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List