सत्तेच्या नशेत चूर असलेला भाजप देवांनाही सोडणार नाही, संबित पात्रांच्या विधानावरून काँग्रेसचा हल्लाबोल
भाजपचे प्रवक्ते आणि पुरी लोकसभेचे भाजपचे उमेदवार संबित पात्रा यांनी भगवान जगन्नाथावरून केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या या विधानावर काँग्रेसने हल्लाबोल केला असून भाजपवर सडकून टीका केली आहे. भाजप सत्तेच्या नशेत झिंगलेला असून तो आता देवांनाही सोडणार नाही, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे.
भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी लाखोंचं श्रद्धास्थान असलेल्या श्री जगन्नाथ महाप्रभूंचा अपमान केला आहे. आम्ही या सगळ्याचा निषेध करतो. सत्तेच्या अहंकारात गुंग असलेला भाजप या देशातल्या लोकांनाच काय पण देवांनाही सोडणार नाही. 4 जून रोजी लोकांच्या इच्छेनेच हा अहंकार नष्ट होईल, असं खरगे यावेळी म्हणाले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संबित पात्रा यांच्या विधानावर टीका करताना म्हटलं की, पंतप्रधान स्वतःला बादशहा आणि त्यांचे दरबारी त्यांना देव मानायला लागले आहेत, तेव्हा आता समजून जा की पापाची लंका लवकरच नष्ट होणार आहे. कोट्यवधी लोकांच्या भावना दुखवण्याचा अधिकार मुठभर भाजपवाल्यांना कुणी दिला? हाच अहंकार त्यांच्या नाशाचं कारण ठरत आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. तर काँग्रेस माध्यम प्रमुख पवन खेरा यांनी भाजपने संबित पात्रा यांना पक्षातून बाहेर काढावं असं म्हटलं आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List